गोरगरीब ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये बळकविणाऱ्या विरोधात पोलिस आयुक्तालयावर सोमवारी धडक मोर्चा

सर्वांनी मोर्चात सहभागी होवून न्याय देण्याचे आदर्श नागरी सहकारी पतसंस्था ठेवीदार संघर्ष कृती समितीचे आवाहन 

छत्रपती संभाजीनगर,१६ जुलै  / प्रतिनिधी :- सर्वसामान्य ठेवीदारांचे तब्बल २०० कोटी हून जास्त रुपयांचा महाघोटाळा करून कोट्यवधी रुपये बळकविणाऱ्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या सर्व  संचालका विरोधात सोमवार  १७ जुलै रोजी सकाळी ११.०० वाजता क्रांती चौक ते थेट पोलिस आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन आदर्श नागरी सहकारी पतसंस्था ठेवीदार संघर्ष कृती समितीच्या वतीने करण्यात आल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी  दिली.


          आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत २०० कोटी रुपयांचा महाघोटाळा उघड झाल्याचे समोर आल्याने सर्व ठेवीदारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. या पतसंस्थेत शहरासह तालुक्यातील सर्व शाखांमध्ये हजारो ठेवीदारांचे शेकडो रुपये अडकले आहेत. मागील दोन-तीन महिन्यांपासून मागणी करूनही ठेवीदारांना पतसंस्थेकडून पैसे देण्यासाठी केवळ तारीख पे तारीख दिली जात होती. ठेवीदार पतसंस्थेच्या शाखांमध्ये चकरा मारत आहेत. मात्र, व्यवस्थापकांकडून ठेवीदारांना तारीख देऊन तुम्हाला पैसे अमुक तारखेला मिळतील असे सांगून केवळ भूलथापा दिल्या गेल्या.
          गोरगरीब, कष्टकरी, वयोवृध्द नागरिक तसेच शेतकरी बांधवांना त्यांच्या आयुष्याची जमापुंजी मिळवून देण्यासाठी सर्वांनी पक्ष भेदभाव विसरून धडक मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन  खासदार इम्तियाज जलील यानी केले आहे.

मोर्चा निघणार म्हणजे निघणारच ! – खासदार जलील

लोकशाहीत प्रत्येक व्यक्तीला अन्यायाविरुद्ध आंदोलन करण्याचा अधिकार आहे. येथे आदर्श नागरी सहकारी संस्थेच्या अध्यक्ष व संचालकांनी केलेल्या फसवणुकीमुळे शेकडो ठेवीदारांचे कष्टाचे पैसे बुडाले आहेत आणि पोलिस सांगतात की ते मोर्चा काढू शकत नाहीत कारण त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होईल. हे काय मूर्खपणाचे कारण आहे? पोलिसांनी कधी कोणत्या राजकीय पक्षाचा मोर्चा याच कारणासाठी रोखला का ? मग आता का ? फक्त ते असहाय लोक आहेत जे त्यांचे पैसे परत मिळवण्यासाठी लढत आहेत. पोलिसांवर दबाव आहे का ? मोर्चा निघणार आहे असे खासदार जलील यांनी स्पष्ट केले.