चांद्रयान-३ अवकाशात झेपावले, देशभरात जल्लोष!

चांद्रयान-3 ने भारताच्या अंतराळ प्रवासामध्ये एक नवीन अध्याय लिहिला आहे : पंतप्रधान

श्रीहरीकोटा : भारताचे ‘चांद्रयान-३’ हे महत्त्वाकांक्षी यान शुक्रवारी दुपारी यशस्वीरीत्या चंद्राच्या दिशेने झेपावले. ‘काउंट डाऊन’ संपताच ज्वाळांचे लोट खाली सारत इस्रोच्या ‘बाहुबली रॉकेट’ म्हणजेच LVM-3 मधून चांद्रयान-३ वेगाने आकाशाच्या दिशेने झेपावले. यावेळी टाळ्यांचा कडकडाट, जोरदार शिट्ट्यांसह ‘भारत माता की जय’च्या घोषणाही देण्यात आल्या.

श्रीहरीकोटा येथे देशभरातून आलेल्या भारतीयांनी भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (ISRO) शास्त्रज्ञांची आणि स्वदेशी तंत्रज्ञानाची कमाल ‘याची देहि याची डोळा’ अनुभवली. देशाच्या तिसऱ्या चांद्रमोहिमेचा पहिला टप्पा यशस्वीपणे सर झाला आणि इस्रोच्या शास्त्रज्ञांसह भारतीयांनी विजयी जल्लोष केला. भारताच्या या मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते.

प्रक्षेपण झाल्यापासून लँडर आणि रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्यापर्यंत, या सर्व स्टेप्स पूर्ण करण्यासाठी सुमारे ४५ दिवस लागणार आहेत.

पहिल्या स्टेपमध्ये ‘चांद्रयान ३’ चे प्री-लॉन्च, लॉन्च आणि रॉकेटला अंतराळात नेणे, तसेच त्याला पृथ्वीच्या वेगवेगळ्या कक्षांमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. यावेळी यान पृथ्वीला सहा प्रदक्षिणा घालणार आहे. दुसऱ्या स्टेपमध्ये ‘चांद्रयान ३’ मार्ग बदलतो. ते पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडते. तर त्याचा प्रत्यक्ष चंद्राकडे (लूनर ट्रान्सफर फेज) जाण्याचा प्रवास सुरू होईल. तिसऱ्या स्टेपमध्ये ‘चांद्रयान ३’ लूनर ऑर्बिट इन्सर्शन (एलओआई) म्हणजे चंद्राच्या कक्षेत पाठवले जाईल.

चौथ्या स्टेपमध्ये ‘चांद्रयान ३’ चंद्राच्या पृष्ठभागावर आपली कक्षा हळूहळू १०० किमीपर्यंत वाढवेल. त्यासाठी सात ते आठ ऑर्बिट मॅन्यूवर करेल. पाचव्या स्टेपमध्ये ‘चांद्रयान ३’ चे प्रोपल्शन मॉड्यूल आणि चंद्र मॉड्यूल एकमेकांपासून वेगळे होतील. सहाव्या स्टेपमध्ये ‘चांद्रयान ३’ डी-बूस्ट होईल, त्यावेळी त्याचा वेग कमी होईल.

सातव्या स्टेपमध्ये ‘चांद्रयान ३’ ची प्री-लॅन्डिंग होईल. ज्यामध्ये यानाच्या लॅन्डिंगची तयारी करण्यात येईल. आठव्या स्टेपमध्ये ‘चांद्रयान ३’ प्रत्यक्षात चंद्रावर लँड होईल. नवव्या स्टेपमध्ये ‘चांद्रयान ३’ चे लॅन्डर आणि रोवर चंद्राच्या पृष्ठभागावर पोहचतील आणि सामान्य ऑपरेशन सुरू करतील. दहाव्या स्टेपमध्ये ‘चांद्रयान ३’ जे प्रोपल्शन मॉड्यूल यानापासून वेगळे झाले आहे ते चंद्राच्या १०० किमीच्या कक्षेत परत येईल.

image.png

भारताची चांद्रयान-तीन ही मोहीम यशस्वी ठरली तर अमेरिका, रशिया आणि चीननंतर चंद्रावर यान उतरवणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे. या मोहिमेसाठी भारताने तब्बल ६१५ कोटी रुपये खर्च केले आहेत. चांद्रयान-३ अंतराळयान ३.८४ लाख किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची अपेक्षा आहे. चांद्रयान-३ ने ४० दिवसांचा प्रवास पूर्ण केल्यानंतर विक्रम लँडरच्या सहाय्याने प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या दक्षिण धुव्रावर उतरणार आहे.

image.png

याआधीचा चांद्रयान-२ मोहिमेद्वारे चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला होता. त्यानंतर इस्रो पुन्हा चार वर्षानंतर चंद्रावर उतरण्याचा दुसरा प्रयत्न करणार आहे. रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर तेथील माहिती गोळा करुन चंद्राची रहस्यं उलगडण्यास मदत होईल.

चांद्रयान-3 ने एक नवीन अध्याय लिहिला आहे : पंतप्रधान

चांद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय शास्त्रज्ञांच्या अथक समर्पणाचे कौतुक केले आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने  केलेले ट्विट सामायिक करत  पंतप्रधानांनी ट्विट केले;

“चांद्रयान-3 ने भारताच्या अंतराळ प्रवासामध्ये  एक नवीन अध्याय लिहिला आहे . प्रत्येक भारतीयाची स्वप्ने आणि महत्त्वाकांक्षा उंचावत उंच भरारी  घेतली आहे.

ही महत्त्वपूर्ण कामगिरी आपल्या शास्त्रज्ञांच्या अथक समर्पणाची  साक्ष  आहे. त्यांच्या धाडसाला आणि कुशाग्र बुद्धिमत्तेला  मी सलाम करतो!”  

चांद्रयान-3 चे यशस्वी प्रक्षेपण म्हणजे भारताच्या स्वदेशी बनावटीच्या क्षमतेचा पुनरुच्चार आणि विक्रम साराभाई यांच्या स्वप्नाची पूर्तता आहे- केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह

चांद्रयान-3 चे यशस्वी प्रक्षेपण म्हणजे भारताच्या स्वदेशी बनावटीच्या क्षमतेचा पुनरुच्चार आणि विक्रम साराभाई यांनी सहा दशकांपूर्वी पाहिलेल्या  स्वप्नाची पूर्तता आहे, असे  केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय राज्यमंत्री, अंतराळ विभाग, अणुऊर्जा विभाग डॉ. जितेंद्र सिंह, कार्मिक , सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले आहे. ते आज श्रीहरिकोटा येथे चांद्रयान-3च्या प्रक्षेपणानंतर बोलत होते. विक्रम साराभाई यांनी सहा दशकांपूर्वी पाहिलेल्या स्वप्नांची ही पूर्तता देखील आहे, ज्यांच्याकडे कदाचित संसाधनांची कमतरता होती, पण आत्मविश्वासाची कमतरता नव्हती, त्यांचा स्वतःवर आणि भारताकडे असलेली अंगभूत क्षमता आणि कौशल्यावर विश्वास होता, असे जितेंद्र सिंह म्हणाले. “ हे प्रक्षेपण म्हणजे भारताची क्षमता आणि अचूकता यावरील विश्वासाची पुष्टी आहे”, त्यांनी सांगितले.

भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या इस्रोच्या चमूचे आभार मानताना डॉ. जितेंद्र सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे श्रीहरिकोटाचे दरवाजे खुले केल्याबद्दल आणि भारताच्या अंतराळ क्षेत्राला सुविधा दिल्याबद्दल आभार मानले.

पंतप्रधान मोदी यांनी म्हटलेल्या ‘स्काय ईज नॉट द लिमिट’ या  वाक्याचा संदर्भ देताना त्यांनी सांगितले की पंतप्रधानांच्या या शब्दांना अनुसरून चांद्रयान-3 आज  आकाशाच्या मर्यादांच्या पलीकडे ब्रह्मांडाच्या शोध न लागलेल्या क्षितीजांचा शोध घ्यायला गेले आहे.

यावेळी डॉ. जितेंद्र सिंह यांनी एका कवितेची ओळ ऐकवत  सांगितले, “ हा भारतासाठी गौरवास्पद क्षण आहे आणि  हा इतिहास घडवण्यामध्ये सहभागी असलेल्या श्रीहरिकोटा येथील आपल्या सर्वांसाठी भाग्यशाली क्षण आहे.”

आपल्या निवेदनाचा समारोप करताना  डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, “भारतमाता पुढील 25 वर्षांच्या अमृतकाळात प्रवेश करत असताना 21 व्या शतकात उदयाला  येणाऱ्या जागतिक परिस्थितीत वैश्विक नेतृत्वाची भूमिका बजावण्याचा तिने संकल्प केला आहे.”

यानंतर एका वार्ताहर परिषदेला संबोधित करताना, डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की पंतप्रधान मोदी यांनी अंतराळ क्षेत्र खाजगी उद्योगांना खुले केल्यामुळे आवश्यक असलेली सर्व प्रकारची महत्त्वाची सामग्री आणि संसाधने उपलब्ध करून देणारी पूरक व्यवस्था निर्माण झाली आहे आणि ज्ञान आणि निधी यामध्येही ताळमेळ निर्माण झाला आहे. चांद्रयान-3 ही मोहीमेत देखील या उद्योगांचे मोठे योगदान आहे, असे ते म्हणाले.

त्यापूर्वी एलव्हीएम3 एम4 हा प्रक्षेपक श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या दुसऱ्या प्रक्षेपण तळावरून दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी अवकाशात झेपावला आणि चांद्रयान-3 चे त्याच्या अचूक कक्षेत यशस्वी प्रक्षेपण केले, ज्यामुळे या यानाने चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. या यानातील सर्व यंत्रणा योग्य पद्धतीने काम करत असल्याचे इस्रोने सांगितले आहे.