हवामान बदलावर लक्ष देणे, असमानता कमी करणे आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा लाभ उठवणे ही कामे बाकी -पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधानांनी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेला केले संबोधित
नवी दिल्ली, 22 सप्टेंबर 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संयुक्त राष्ट्राच्या आमसभेला संबोधित केले.
यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की पंच्याहत्तर वर्षांपूर्वी मानवी इतिहासामध्ये प्रथमच संपूर्ण जगासाठी एक संस्था तयार केली गेली आणि युद्धाच्या भीतीतून एक नवी आशा निर्माण झाली. ते म्हणाले की, संयुक्त राष्ट्र संघटनेचा संस्थापक स्वाक्षरीकर्ता या नात्याने भारत हा उदात्त दृष्टीचा भाग होता ज्यातून ‘वसुधैव कुटुंबकम्’ – ज्यात सर्व सृष्टीकडे एक कुटुंब म्हणून पाहिले जाते, हे भारताचे स्वतःचे तत्वज्ञान प्रतिबिंबित होते.
ज्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या शांतता अभियानासह शांतता आणि विकासाचे कार्य पुढे नेले त्या सर्वांना अभिवादन करताना पंतप्रधान म्हणाले की, संयुक्त राष्ट्रांमुळे आपले जग आज एक उत्तम जागा आहे. आज मान्यता देण्यात आलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या जाहीरनाम्याबाबत पंतप्रधान म्हणाले की बरेच काही साध्य झाले असले तरी अद्याप मूळ ध्येय अपूर्ण राहिले आहे. आणि आज आपण स्वीकारत असलेले व्यापक घोषणापत्र कबूल करते कि अद्याप संघर्ष रोखण्याचे , विकास सुनिश्चित करणे, हवामान बदलावर लक्ष देणे, असमानता कमी करणे आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा लाभ उठवणे ही कामे बाकी आहेत. या घोषणापत्रात संयुक्त राष्ट्रांमध्ये सुधारणा करण्याची गरजही व्यक्त करण्यात आली आहे.
पंतप्रधान म्हणाले की, सर्वसमावेशक सुधारणांशिवाय संयुक्त राष्ट्र संघाला आत्मविश्वासाचे संकट भेडसावत आहे आणि आजची आव्हाने कालबाह्य रचनांसह लढली जाऊ शकत नाहीत. त्यांनी नमूद केले की, आजच्या परस्परांशी जोडल्या गेलेल्या जगासाठी आपल्याला सुधारित बहुपक्षीयवादाची आवश्यकता आहे, जी आजची वास्तविकता प्रतिबिंबित करते; सर्व हितधारकांचा आवाज होते, समकालीन आव्हाने सोडवते; आणि मानवी कल्याणावर लक्ष केंद्रित करते. या दृष्टीने इतर सर्व देशांबरोबर काम करण्यासाठी भारत उत्सुक आहे.