बाभूळगावगंगा येथील विहिरीत एकाचा मृतदेह आढळला ; मृत व्यक्ती श्रीरामपूर तालुक्यातील

घरगुती वादातून आत्महत्या केल्याचा संशय 

वैजापूर ,२८ जून/ प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील बाभुळगावगंगा येथे गोदावरी नदीपात्रातील विहिरीत मंगळवारी (27) रात्री एकाचा मृतदेह आढळुन आला. सागर रावसाहेब जाधव (वय ३५, रा.रामपूर, ता.श्रीरामपूर) असे त्यांचे नाव असून त्यांनी घरगुती वादातुन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे. नाऊर रस्त्यावरील पुलाजवळ गोदावरी नदीच्या पात्रात असलेल्या विहिरीत मृतदेह  आढळुन आला.

घटनेची माहिती मिळताच विरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री अकरा वाजल्याच्या सुमारास मृतदेह विहिरीतुन बाहेर काढण्यात आला. वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी तपासून त्यांस मृत घोषित केले‌. याप्रकरणी वैद्यकिय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीवरुन विरगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल गणेश पंढुरे हे करीत आहेत.