येत्या २४ तासांत पावसाची अशी असेल स्थिती, नेमकी कशी? घ्या जाणून

मुंबई: आता पावसाने महाराष्ट्रावर आपली कृपादृष्टी अखेर दाखवली. लाही लाही झालेल्या मुंबईकरांसह सर्वांची पावसाची प्रतीक्षा संपली असून राज्याच्या अनेक भागांत जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पुणे, मुंबईसह (Pune and Mumbai) अनेक भागात आज सकाळपासून पावसांच्या सरीने बरसायला सुरुवात केली. वातारवणात निर्माण झालेल्या गारव्याने शेतकऱ्यांसह सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. येत्या चोवीस तासांत मान्सून (Monsoon) मुंबईसह राज्याला भिजवणार, अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तविली जात आहे.

महाराष्ट्रातल्या बहुतेक जिल्ह्यांमध्ये आज पावसाने हजेरी लावली. आज सकाळपासूनच मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरांमध्ये तर पुण्यात जोरदार पाऊस झाला. पुण्यात मान्सून दाखल झाल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली. पण मुंबईत झालेला पाऊस हा मोसमी पाऊस होता का? यासंदर्भात अद्याप हवामान विभागाने माहिती दिलेली नाही.

राज्यात यंदा मान्सूनचे आगमन उशिरा झालं, कारण बिपरजॉय चक्रीवादळाचा मान्सूनच्या प्रगतीवर मोठा परिणाम झाला. मात्र चक्रीवादळाचा प्रभाव कमी होताच मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे. दरम्यान, कोकण किनारपट्टीवर जोरदार वारे वाहणार असल्याने मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.

पालघरमध्ये यलो अलर्ट…

हवामान खात्याकडून पालघर जिल्ह्याला मंगळवारपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच, शनिवार ते मंगळवार रायगड, रत्नागिरी या ठिकाणी विविध ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्गातही सोमवारपर्यंत विविध ठिकाणी मुसळधार पाऊस होईल. त्यामुळे आता मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे, असे म्हणता येईल.