मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल होणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रकृतीसंदर्भात निवेदन

सर्वांना लसींचे दोन डोस घेणे अतिशय महत्त्वाचे

मुंबई,१० नोव्हेंबर /प्रतिनिधी:- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या प्रकृतीसंदर्भात निवेदन केले असून मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी निवेदनात म्हटले आहे की, गेल्या सुमारे दोन वर्षांपासून आपण कोविडचा मुकाबला करतो आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असतांना दुसरीकडे आपले जीवनचक्र सुरू राहावे, राज्यातली विकासकामे सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्याने प्रयत्न करतोय. मान देखील वर करायला वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हणलं तरी थोडंसं दुर्लक्ष झाले आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच.

पण या दुखण्यावर व्यवस्थित उपचार व्हावेत यादृष्टीने डॉक्टरांनी सल्ला दिल्यावरून मी आज रुग्णालयात दाखल होणार असून दोन-तीन दिवस तिथेच राहून योग्य ते उपचार घेणार आहे.

आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, त्यामुळे लवकरच तब्येत बरी होईल अशी खात्री आहे.

यानिमित्ताने एकच सांगायचे आहे. कोरोना लसींच्या बाबतीत आपण १० कोटींचा टप्पा ओलांडला असला तरी आपल्याला सर्वांना लसींचे दोन डोस घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. आपल्या जीवनाला सुरक्षित ठेवण्यासाठी लगेचच जवळच्या केंद्रावर जाऊन लस घ्या एवढीच विनंती करतो, असे आवाहनही श्री.ठाकरे यांनी केले आहे.