राज्यात मान्सूनचे आगमन

पुणे,​११ जून ​/ प्रतिनिधी :- जून महिना लागला म्हणजे सर्वाच्या नजरा या पावसाच्या दिशेने लागून असतात. शेतकरी देखील जूनपूर्वी आपल्या शेतीची मशागत करुन वरुण राजाची वाट पाहत असतो. आता सर्वांची प्रतिक्षा मिटणार आहे. राज्यात मान्सूनचं आगमन झालं असून याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यामुळं शेतकऱ्यांनी आता पेरणीसाठी तयार रहावं. मात्र, पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करण्याची घाई करु नये, असा सल्ला हवामान विभागाच्या तज्ञांनी दिला आहे. तसंच अरबी समुद्रात घोंगावणारं ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ हे 14 जूनपर्यंत कायम राहणार असल्याचं सांगितलं जात आहे.

राज्यातील कोकण किनारपट्टीवर पाऊस सुरु झाला आहे. पुढचे दोन दिवस बिपरजॉय चक्रीवादळाचे परिणाम कोकण किनारपट्टीवर जाणवणार असून पुढील दोन दिवस ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. कोकणातील अनेक भागात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली होती. आता मात्र राज्यात मान्सून दाखल झाला असून याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. आज (11जून) रोजी दुपारी 1:30 वाजता राज्यात मान्सून दाखल झाला आहे. हवामान विभागानं याबाबतची घोषणा केली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झाला आहे. राज्यातील कोकणात तसेच बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर यासह इतरही अनेक जिल्ह्यात काल पासून पावसाला सुरूवात झाली. मुंबईमध्ये काल पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. मान्सून जूनच्या आसपास महाराष्ट्रामध्ये दाखल होत असतो. पण यावर्षी मान्सूनचे आगमन होण्यासाठी तब्बल एक आठड्याचा उशीर झाला आहे. मान्सूनने महाराष्ट्रामध्ये दाखल होण्यासाठी ११ जूनची तारीख गाठली. आता हळूहळू मान्सून पुढे सरकरत संपूर्ण राज्यात सक्रीय होईल.

दरम्यान, हवामान खात्याने राज्यात पुढील चार ते पाच दिवस मेघगर्जनांसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. बिपारजॉय चक्रीवादळाने मार्ग बदलल्याने पश्चिमी किनारपट्टी भागात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण झाले. पुढील ४८ तासात मान्सून पुढे सरकत मुंबईत दाखल होईल.

पुणे हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के एस होसाळीकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट करत राज्यात मान्सूनचं आगमन झाल्याचं सांगितलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी नैऋत्य मान्सूनचं 11 जून रोजी महाराष्ट्रात आगमन झाल असल्याचं सागितलं आहे. तसंच दक्षिण कोकणातील काही भाग, दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भाग, संपूर्ण गोवा, तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशचा काही भाग मान्सूननं व्यापला असल्याची देखील माहिती होसाळीकर यांनी दिली आहे.