अवयवदान चळवळ व्यापक होण्यासाठी जनजागृतीची गरज – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन

छत्रपती संभाजीनगर,७  एप्रिल / प्रतिनिधी :-   अवयवदान श्रेष्ठ दान आहे. आपण मृत्यूनंतर आपले अवयवदान करून अनेकांचे प्राण वाचवू शकतो. ज्या रुग्णांचे अवयव कायमस्वरूपी निकामी झाले आहेत, अशा अनेक रुग्णांसाठी अवयवदान हाच एक आशेचा किरण असतो. अवयवदानाची चळवळ व्यापक होण्यासाठी सर्वांनी याबाबत जनजागृती करणे महत्त्वाचे असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.

राज्यस्तरीय ‘अवयवदान जनजागृती अभियान’ चे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) येथे पार पडले. यावेळी केंद्रीय

केंद्रीय  वित्त राज्य मंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार इम्तियाज जलील, आमदार सर्वश्री हरिभाऊ बागडे, प्रशांत बंब, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सह संचालक डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता डॉ. संजय राठोड,भाजपचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. महाजन म्हणाले की,  पाश्चिमात्य देशात १० हजार लोकसंख्येमागे अवयवदान करणाऱ्यांची संख्या ३५०० आहे तर हेच प्रमाण आपल्या देशात केवळ १ आहे. त्यामुळे याबाबत जनजागृती आवश्यक आहे. आपल्या समाजात अवयवदानाविषयी म्हणावी तेवढी जागृती नसल्याने कित्येक रुग्ण वर्षांनुवर्ष प्रतिक्षेत आहेत. अवयवदान हे केवळ डोळे आणि किडनीपुरते मर्यादित नसून शरीरातील विविध अवयव आपण दान करु शकतो. पण यासाठी आवश्यक आहे  ती पुरेशी माहिती आणि इच्छाशक्ती.  आपण केलेल्या अवयवदानामुळे अनेकांना जीवदान मिळू शकते. म्हणून याबाबत जागृती होणे आवश्यक आहे. राज्यस्तरीय ‘अवयवदान जनजागृती अभियान’ चे उद्घाटन झालेले आहे. आता ह्या चळवळीला व्यापक करणे आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचेही ते म्हणाले. सध्या स्त्रियांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे तर तरुणांमध्ये मुख कर्करोगाचे प्रमाण जास्त  आहे. ग्रामीण भागातील महिलांमध्ये बचत गटातील महिलांमार्फत स्तनाच्या कर्करोगाविषयी जनजागृती करण्यात येत आहे. तरुणांनी देखील व्यसनापासून दूर राहुन शरीर निरोगी ठेवण्यासाठी सकस आहार घ्यावा आणि नियमित व्यायाम करावा. घाटी रुग्णालयातील रिक्त पदांची देखील लवकरच पदभरती केली जाईल. निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहाच्या समस्या प्राधान्याने सोडविणार असल्याचे त्यांनी सांगितले. पैठण येथे १०० खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी सकारात्मक असल्याचेही ते म्हणाले.

केंद्रीय  वित्त राज्य मंत्री डॉ. कराड म्हणाले की, अवयवदान हे जगातील सर्व श्रेष्ठ दान आहे. आपल्या मृत्यूनंतर सारे नष्ट होते. मात्र अवयवदान केल्याने एक देह अनेक जणांच्या आयुष्यात एक आशेचा किरण ठरू शकतो. अवयवदान ही काळाची गरज असल्याचेही ते म्हणाले.

पालकमंत्री श्री. भुमरे म्हणाले की, अवयवदानाची चळवळ व्यापक करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मराठवाड्यातीलच नाहीतर अनेक जिल्ह्यातील गरीब आणि गरजू रुग्णांना वरदान ठरलेल्या घाटी रुग्णालयाला जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपकरणे आणि औषध खरेदीसाठी सुमारे १७ कोटी रुपये दिले असले तरी वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत गरीब रुग्णांसाठी आणखी मोठ्या प्रमाणात औषध पुरवठा होणे आवश्यक आहे. तसेच पैठण येथे पर्यटक आणि भाविक मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे पैठण शहरात किमान १०० खाटांचे रुग्णालय मंजूर करावे असेही ते म्हणाले.

सहकार मंत्री श्री. सावे म्हणाले की, अवयवदान चळवळ व्यापक करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. कोविड काळात घाटीमध्ये अनेक रुग्णांना जिवदान मिळाले आहे. घाटीमध्ये सर्व डॉक्टर्स निष्णात असून येथे उपचार देखील खूप चांगल्या प्रकारे मिळतात.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, अवयवदान चळवळ मोठी होणे आवश्यक असून यामध्ये सामान्य जनतेने सहभाग घेणे आवश्यक आहे.

खासदार इम्तियाज जलील  म्हणाले की, आमच्या शहराला अवयवदानाची मोठी परंपरा आहे. घाटीमध्ये आज अनेक समस्या आहेत. आरोग्य सेवेत महत्त्वाची असणारी वर्ग ४ पदे लवकर भरावीत. तसेच  घाटीवर येणारा वाढता ताण पाहता शहागंज येथे मॅटर्निटी हॉस्पीटल सुरू करण्याची मागणी देखील त्यांनी केली.