मुंबईत पूर येण्यापूर्वीच त्याचे भाकीत वर्तविणे लवकरच होणार शक्य, मालमत्तेचा सांभाळ व जीविताचे संरक्षण करण्यासही होणार मदत

‘एकात्मिक पूर इशारा यंत्रणा’ मुंबईसाठी वरदान ठरेल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई दि. १२: मान्सून काळात एकात्मिक पूर इशारा यंत्रणा (इं‍टिग्रेटेड फ्लड वॉर्निंग सिस्टीम) ही मुंबईसाठी वरदान ठरणार आहे. जीआयएस आधारित या यंत्रणेमुळे आता कोणत्या भागात पाणी साचणार, पूर येणार आहे तसेच अगदी वादळासारख्या संकटाची देखील पूर्व सूचना मिळून सावध होता येणार आहे. या यंत्रणेत उपयोगात आणल्या जाणाऱ्या हायड्रोलिक मॉडेलमुळे एखाद्या भागात गटारी, नदी यातील रिअल टाईम होणारी पाण्याची होणारी हालचाल, त्याचे प्रवाह याचे आडाखे बांधता येणे शक्य होईल. यामुळे मुंबईला पुराच्या धोक्यापासून वाचविणे शक्य होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

  • पूर येण्यापूर्वी 3 दिवस त्याचा अंदाज प्रभागस्तरावर मिळू शकणार.
  • निर्णय आधार प्रणालीमुळे निर्णयप्रक्रिया झटपट होऊ शकणार आणि धोक्याचे मूल्यमापन करून प्रत्यक्ष क्षेत्रात कार्यवाही करणे शक्य होणार
  • भूविज्ञान मंत्रालयाने विकसित केलेली अद्ययावत पूर-इशारा प्रणाली ही मुंबईकरांसाठी भेटच- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • विज्ञानाबाबत आपण जगातील कोणाहीपेक्षा कणभरही कमी नाही- डॉ.हर्षवर्धन, भूविज्ञान मंत्रालयाच्या शास्त्रज्ञांचे केले अभिनंदन

मुंबईसाठी पुराचा इशारा देणाऱ्या अद्ययावत एकात्मिक अशा ‘iFLOWS-मुंबई’ या प्रणालीचा आज, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे आणि केंद्रीय भूविज्ञान मंत्री डॉ.हर्ष वर्धन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून एकत्रितपणे प्रारंभ केला.

मुसळधार पाऊस आणि चक्रीवादळाच्या वेळी मुंबईतील पाणी वाढण्याविषयी म्हणजे पूरस्थितीविषयी पूर्वसूचना देऊन, बचावाच्या दृष्टीने शहराला अधिक समर्थ करणे, या प्रणालीमुळे शक्य होणार आहे. या प्रणालीचा वापर करून 3 दिवस आधी पुराचा अंदाज वर्तविणे आणि 3 ते 6 तासांपर्यंतच्या तत्कालीन अंदाजासह तसे भाकीत वर्तविणे शक्य होणार आहे. विशेषकरून, सखल भागातुन लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची गरज उत्पन्न होणार असल्यास, याचा निश्चित उपयोग होईल, कारण ,एखादा विशिष्ट भाग पाण्याखाली जाणार असल्याचा अंदाज आपणास 12 तास अगोदरच कळू शकेल. प्रत्येक लहान-लहान भागातील पावसाच्या प्रमाणाचाही अंदाज या प्रणालीमुळे कळू शकेल.

या कार्यक्रमाला संबोधित करताना केंद्रीय मंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी, पूर-इशारा प्रणाली विकसित करणाऱ्या केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. “विज्ञानाबाबत आपण जगातील कोणाहीपेक्षा कणभरही मागे नाही” अशी अभिमानाची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. “मुंबईची पूरस्थिती- विशेषतः 2005 आणि 2017 मधील अवस्था सर्वांच्याच स्मरणात आहे. आता ही अत्याधुनिक पूर-इशारा प्रणाली मात्र मुंबईकरांच्या मदतीला धावून येणार आहे.” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “भूविज्ञान मंत्रालयानेच तयार केलेली अशाच प्रकारची प्रणाली चेन्नईमध्ये यापूर्वी कार्यान्वित करण्यात आलेली आहे.” असेही ते म्हणाले.

“भूविज्ञान मंत्रालयाच्या शास्त्रज्ञांनी विकसित केलेली त्सुनामीसाठीची पूर्वसूचना प्रणाली ही संपूर्ण जगात सर्वोत्कृष्ट अशी आहे, आणि तिने याबाबत कधीही चुकीचा धोक्याचा इशारा दिलेला नाही” असे प्रतिपादनही डॉ.हर्षवर्धन यांनी केले. हिंदी महासागर क्षेत्रातील अन्य देशांपर्यंत या प्रणालीची सेवा विस्तारित करण्यात आली असून, त्यांना याचा मोठा फायदा होत आहे, असेही ते म्हणाले.  

यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, मी सर्वप्रथम भारतीय हवामान विभागाचे मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी मान्सून ११ तारखेला येणार असे जाहीर केले होते , त्याप्रमाणे बरोब्बर पावसाने हजेरी दिली. आणखी एका कारणासाठी अभिनंदन करायचे आहे ते म्हणजे निसर्ग चक्रीवादळाची सगळी इत्यंभूत माहिती हवामान खाते देत होते. या वादळाची दिशा बदलली तसेच त्याचा वेग मंदावला वगैरे गोष्टी आम्हाला कळत होत्या त्यामुळे तशी यंत्रणा सज्ज होती. यामुळे जीवितहानी टाळता आली.

कोणतीही आपत्ती आली तर आपण त्यापासून काय शिकतो हे महत्वाचे आहे. केंद्रीय मंत्री डॉ.हर्षवर्धन सध्या देशातील सर्वात व्यस्त मंत्री असतील. आरोग्यमंत्री म्हणून ते कोरोनाचा मुकाबला करीत आहेत. त्यांच्या दृष्टीने आता ब्लड मॅनेजमेंट आणि फ्लड मॅनेजमेंट दोन्ही महत्वाचे आहे. मुंबईसह राज्याने २००५ मध्ये पुरामुळे नुकसान अनुभवले. यात हाय टाईड आल्यावर समुद्रातून उलटे पाणी येऊन मुंबईत पाणी साचते या बाबी लक्षात आल्या. हे टाळण्यासाठी आम्ही पंपिंग स्टेशन्सही  बसवले. त्याचकाळात पावसाळ्यानंतर लेप्टो, डेंग्यू अशा साथी आल्या. या साथींचे निदान होण्यासाठी २००७ मध्ये मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयामध्ये देशातली पहिली मॉलिक्युलर लॅब आम्ही बनविली.  आता कोरोना साथीतही आम्ही शिकलो. त्यामुळेच पूर्वी २ लॅब होत्या त्या ८५ झाल्या आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

तसेच आम्ही मंत्रिमंडळात पर्यावरण विभागाचे नाव बदलून ‘पर्यावरण आणि वातावरणीय बदल’ विभाग असे केले आहे. पर्यावरणाकडे एका वेगळ्या नजरेने आणि गांभीर्यपूर्वक पाहण्यास आमची सुरुवात झाली आहे, असे नमूद करतांनाच, येत्या काळात भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी डॉपलर रडार लवकरात लवकर बसविले पाहिजे जेणे करून हवामांचा अचूक अंदाज शक्य होईल, अशी मागणी ही श्री.ठाकरे यांनी यावेळी केली.

“मुंबईसाठी 160 पेक्षा जास्त वेधशाळा आणि (पुढच्या पावसाळ्यापर्यंत उपयोगात येणारे असे) आणखी 4 रडार- ऑर्डर केले असून यामुळे दर 500 मीटर अंतरापर्यंत व दर 15 मिनिटांसाठी पावसाचा अंदाज वर्तविणे शक्य होणार आहे”, अशी माहिती केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ.एम.राजीवन यांनी यावेळी दिली. ‘आयफ्लोज मुंबई’ या पूर-इशारा प्रणालीचे काम वेळेवर पूर्ण करता आल्याबद्दल राजीवन यांनी समाधान व्यक्त केले.

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त श्री.इकबालसिंग चहल म्हणाले की, “आयफ़्लोज मुंबई’ हे पूर्ण देशासमोरचे आदर्श उदाहरण ठरेल.” भूविज्ञान मंत्रालयाप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करून, “ही प्रणाली मोसमी पावसाचे मुंबईत आगमन होण्याच्या आधी अगदी वेळेवर सुरु होत आहे” अशा शब्दात त्यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी, मुंबई पूर-इशारा प्रणालीची एक ध्वनिचित्रफीत दाखविण्यात आली आणि या प्रणालीबाबतचे एक डिजिटल माहितीपत्रकही प्रकाशित करण्यात आले. भारतीय हवामानशाश्त्र विभागाच्या मुंबई क्षेत्राचे उप-महासंचालक श्री. के.एस.होसाळीकर हेही यावेळी उपस्थित होते.

ही अंदाज-प्रणाली कशी काम करते ? 

भूविज्ञान मंत्रालयाच्या शास्त्रज्ञांनी मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने ही अत्याधुनिक प्रणाली तयार केली आहे. पावसाच्या परिमाणाची आकडेवारी तसेच, मुंबई मनपाने पुरविलेली अन्य स्थानिक माहिती- जसे की- भूमी-उपयोजनाची आकडेवारी, जमिनीचे चढ-उतार, जलनिस्सारण प्रणाली, शहरातील जलस्त्रोत, भरतीची पातळी, पायाभूत सुविधा आणि लोकसंख्या, इत्यादी. या सर्व माहितीचा वापर करून ही प्रणाली हवामान, पर्जन्यमान, पाणी वाहून जाण्याचे प्रमाण, पाण्याची हालचाल, भरती आणि वादळी स्थितीमुळे होणारी वाढ व तिचा प्रभाव या सर्वांबद्दलचे एक प्रतिमान (मॉडेल) तयार करते, व त्या आधारे अंदाज व्यक्त करते. पावसामुळे येणारी पूरस्थिती, नदीकाठांच्या वरून पाणी वाहणे, वादळाचा प्रभाव, रस्त्यामुळे तसेच इमारती, रेल्वेमार्ग, यामुळे प्रवाहात निर्माण होणारा अडथळा, भरती आणि सागरजलपातळीत वाढ- अशा सर्व मुद्द्यांचा या प्रणालीत विचार केलेला आहे. 

आयफ्लोज प्रणालीमध्ये सात भाग आहेत. यापैकी, माहिती संकलन भागात हवामानविभागाच्या अंदाजांसह विविध प्रकारची माहिती मोठ्या प्रमाणात गोळा  केली जाते. यात मुंबईतील नद्या आणि सरोवरांच्या खोलीबद्दलच्या माहितीचाही समावेश आहे. पूरस्थिती भागात ही सर्व माहिती, पुराची 3 दिवस अगोदर माहिती देण्यासाठी वापरली जाईल. तर शहरातील विविध क्षेत्रातून पाण्याची हालचाल कशी होईल याबद्दल प्रणालीचा पूर भाग माहिती देईल. प्रणालीच्या धोकाविषयक भागांची मिळून निर्णय-आधार-व्यवस्था बनलेली आहे. यामुळे पूरस्थिती पाहून झटपट व शास्त्रशुद्ध निर्णय घेण्यास प्रशासनाला मदत होणार आहे. प्रणालीतील वितरण भागामुळे प्रत्यक्ष क्षेत्रातील अधिकाऱ्यांना संपर्कयंत्रणेद्वारे सर्व माहिती पोहोचविण्याची सोय होते. यामुळे प्रत्यक्ष क्षेत्रात तत्पर कार्यवाही करणे शक्य होते.

याने आकार कसा घेतला? 

महाराष्ट्राची राजधानी मुंबई, हे देशातील एक प्रमुख महानगर आणि भारताच्या आर्थिक राजधानीचे शहर. शहराला नैसर्गिक आणि वादळी स्थितीतील जलनिस्सारण यंत्रणा लाभलेली असूनही वारंवार येणाऱ्या पूरस्थितीमुळे शहर ठप्प होण्याचे संकट अनेकदा ओढवते. या पूरप्रवण शहरातील बचावयंत्रणेला पूरक ठरण्यासाठी मुंबईसाठी एकात्मिक पूर-इशारा प्रणाली विकसित करण्याच्या उद्देशाने,चेन्नईतील अशाच प्रकारचे प्रतिमान डोळ्यासमोर ठेवून महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाशी संपर्क साधला. सदर मंत्रालयाने जुलै-2019 मध्ये कामास सुरुवात केली. हवामानशास्त्र विभाग, मध्यम पल्ला हवामान अंदाज वर्तविणारे राष्ट्रीय केंद्र, भारतीय उष्ण कटिबंधीय हवामान संस्था, आणि राष्ट्रीय किनारी संशोधन संस्था यांच्याकडील ज्ञानाचा व तंत्र-कौशल्यांचा वापर करून तसेच महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सहकार्याने सदर प्रकल्प पूर्ण करण्यात आला.
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *