‘बीआरएस’च्या सभेची जय्यत तयारी सुरू; ‘अब की बार किसान सरकार’

नियोजनासाठी पक्षाचे निरीक्षक, खासदार, आमदार तळ ठोकून

प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केली सभा स्थळाची पाहणी

छत्रपती संभाजीनगर ,२२  एप्रिल / प्रतिनिधी :-भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाने ‘अब की बार किसान सरकार’ हे घोषवाक्य घेऊन महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. या पक्षाची जाहीर सभा २४ एप्रिलला छत्रपती संभाजीनगर शहरात आयोजित करण्यात आली आहे. बीड बाय पास रोडवरील जबिंदा मैदानावर होणाऱ्या सभेची जय्यत तयारी सुरू असून पक्षाचे नेते, निरीक्षक, खासदार, आमदार सभेच्या नियोजनासाठी शहरात तळ ठोकून आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात पक्ष वाढवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. याची सुरूवात त्यांनी नांदेडपासून केली. नांदेडमध्ये अनेक स्थानिक नेत्यांना पक्षात प्रवेश दिल्यानंतर आता मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगरवर लक्ष केंद्रीत केले आहे. यासाठी २४ एप्रिलला जबिंदा मैदानावर सायंकाळी ५ वाजता विराट जाहीर सभा होणार आहे. राज्यभरातून, विशेषत: मराठवाड्यातून या सभेसाठी पक्षाचे कार्यकर्ते, शेतकरी बांधव सभेत सहभागी होण्यासाठी छत्रपती संभाजीनगरात येणार आहे.

जिल्ह्यातील अनेक स्थानिक नेते, शेतकरी नेते या सभेत प्रवेश घेणार असल्याने राज्याच्या राजकारणात प्रवेश करताना बीआरएससाठी मराठवाडा केंद्रबिंदू ठरणार आहे. दरम्यान, या सभेसाठी जबिंदा मैदानाची निवड करण्यात आली आहे. मैदानावर भव्य व्यासपीठ आणि कार्यकर्त्यांना बसण्यासाठी मोठ्या प्रमाणात खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. सभेची जय्यत तयारी बीआरएसच्या वतीने करण्यात येत असून पक्षाचे नेते लक्ष ठेवून आहे. शुक्रवारी (दि.२१) पक्षातील नेत्यांनी पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांच्यासमवेत सभा स्थळाची पाहणी केली. यावेळी जहीराबादचे खासदार बी. बी पाटील, आयडीसीचे अध्यक्ष वेणुगोपाल चारी, बीआरएस पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस हिमांशू तिवारी, बीआरएस पार्टी महाराष्ट्र किसान समितीचे अध्यक्ष माणिक कदम यांच्यासह बीआरएस नेते उपस्थित होते.

सभा यशस्वीतेसाठी बीआरएस पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रभारी आ. जीवन रेड्डी, खासदार बी. बी. पाटील, आ. शकील अहमद, भारत राष्ट्रीय किसान समितीचे राजाध्यक्ष माणिक कदम, राष्ट्रीय सरचिटणीस हिमांशू तिवारी, राज्याचे नेते प्रविण जेठेवाड, मौलाना अब्दूल कदीर, हर्षवर्धन जाधव, शंकर अण्णा धोंडगे, अभय पाटील चिकटगावकर, अण्णासाहेब माने पाटील, दिलीप अण्णा गोरे, शिवराज बांगर, संतोष माने पाटील, नागनाथ घिसेवाड परिश्रम घेत आहेत. 

सभेनंतर बदलणार राज्याचे राजकारण

या सभेच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासातील सर्वात मोठ्या सभेचे विक्रम बीआरएस करणार आहे. या सभेनंतर निश्चितच राज्याचे राजकारण बदलणार आहे. सभेच्या अनुषंगाने पक्षाने मोबाईल स्क्रीनिंग वाहनाच्या माध्यमातून प्रचार सुरू केला आहे. ज्यात कृषी क्षेत्राला मोफत आणि दर्जेदार वीज, शेतकऱ्यांना कर्जमाफी, सिंचन प्रकल्पांचे बांधकाम, पेन्शन, रयतु बीमा यासारख्या सरकारी योजनांचा समावेश आहे. दरम्यान, विविध पक्षांच्या नेत्यांनी बीआरएस पक्षात प्रवेश करण्यास सुरूवात केली आहे. ज्यात ज्येष्ठ राजकारणी, शेतकरी संघटनांचे नेते, समाजसेवी आणि इतर अनेक नेते मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत बीआरएसमध्ये सामील होणार आहे.