महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरे यांचा पुन्हा एकदा राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा

नागपूर,१६ एप्रिल  / प्रतिनिधी :-महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. “हिंदुत्वाच्या भाकड कथा आम्हाला सांगू नका, आमचं हिंदुत्व शेंडी जानव्याचं नाही. यांचं हिंदुत्व हे गोमूत्रधारी आहे”, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला आहे.

नागपूर येथे महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पाडली. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्य नाना पटोले, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री सुनील केदार, माजी मंत्री विजय वडेट्टीवार आदी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी आपले विचार मांडले. यावेळी विधासभा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते, खासदार, आमदार उपस्थित होते.

देशात लोकशाही आहे की नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे. सत्तेवर बसलेल्या लोकांच्या मित्रांच्या फायद्यासाठी लोकशाहीचा वापर केला जात आहे. यांच्या मित्रांचे नंबर श्रीमंतीत वर जात आहे तर जनतेचा नंबर मात्र खाली खाली जात आहे.लोकशाहीच्या मार्गाने देश चालण्यासाठी ज्या माणसाने संविधान दिले त्याचे रक्षण आम्ही करु शकत नाही का? घटना बचाव नाही तर घटनेचे रक्षण मीच करणार अशी म्हणण्याची वेळ आली आहे, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

राज्यात शिंदे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांवर संकटा मागून संकटे येत आहेत. राज्यातील सरकार हे अवकाळी सरकार आहे. आमचे सरकार असताना शेतकऱ्यांना तात्काळ मदत केली आता मात्र पंचानाम्याचे करत बसले आहेत. मी काँग्रेसबरोबर गेलो म्हणजे हिंदुत्व सोडले असा आरोप करता, काँग्रेसवाले हिंदू नाहीत का? आमचे हिंदुत्व शेंडी जाणव्याचे नाही. यांचे हिंदुत्व गोमुत्रधारी आहे. सरसंघचालक मोहन भागवत मशिदीत जाऊन आले, मी मशिदीत जाऊन आलो असतो तर किती गोंधळ घातला असता. मशिदीत जाऊन हे कव्वाली गाणार. देशात व राज्यात आज जो कारभार सुरु आहे तो रा. स्व. संघाला मान्य आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

दर वेळेला माझ्यावर आरोप केला जातो, मी काँग्रेससोबत गेलो म्हणजे हिंदुत्व सोडलं. का? काँग्रेसमध्ये कोणी हिंदु नाही का? मग संघाला देखील मला विचारायचय, नेमक तुमच आणि भाजपच चाललंय काय? यांच हिंदुत्व हे गोमुत्रधारी हिंदुत्व आहे. ते एवढ्यासाठी की संभाजीनगरला अशीच अलोट गर्दी झाली, तिकडे हे गोमुत्रधारी गेले, गोमुत्र शिंपडायला. अरे थोड प्राशन करा, थोडी अक्कल येईल. आमच हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे, भाजपने जाहीर करावं त्यांच हिंदुत्व म्हणजे काय? एका बाजुला हनुमान चालीसा म्हणायची, दुसर्‍या बाजुला मशीदीत जाऊन हे कव्वाली ऐकणार, उत्तरप्रदेशात मदरसात जाऊन उर्दुत मन की बात करणार. हे यांच हिंदुत्व. या हिंदुत्वाच्या भाकडकथा आम्हांला सांगु नका, या देशासाठी मातीसाठी जो जीव द्यायला तयार तो आपला माननार आमचं हिंदुत्व.

ही लढाई तुमच्यासाठी सुरु आहे, यात तुमचा सहभाग महत्वाचा आहे, तुमची साथ असेल तर आता जिंकेपर्यंत थांबायचे नाही. धार्मिक मुद्दे पुढे करुन जनतेचे मुद्दे टाळले जात आहेत. लोकशाही मेली नाही मरु देणार नाही असा निर्धार करा आणि आगामी निवडणुकीत भाजपाला घरी बसवा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं. ‘उलट्या पायाचं सरकार आलं आणि सतत गारपीट होत आहे. हे सरकार अवकाळी आहे. अयोध्येला मीसुद्धा गेलो होतो. ती वेळ वेगळी होती. राम मंदिराचा मुद्दा कोर्टात होता. आधी मंदिर मग सरकार, आम्ही मोदींना सांगितलं. मोदी म्हणाले आता नको. आता हे टिकोजी राव फणा काढतोय. हे रामभक्त असते तर सुरतला नाही तर अयोध्येला गेले असते. आताचे उपमुख्यमंत्री आधी कधी अयोध्येला गेले नाहीत. माझा शर्ट अधिक भगवा दाखवण्यासाठी गेले,’ अशी टीका उद्धव ठाकरेंनी फडणवीस यांच्यावर केली.

शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष, जाहीरातीवर खर्च – नाना पटोले


राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्यामागे अवकाळी पाऊस लागला असून शेतकऱ्यांचं मोठे नुकसान झालं. पण हे सरकार शेतकऱ्यांना मदत करत नाही. गारपीट झाली, शेतकरी ढसाढसा रडतोय त्याला मदत देत नाही. दुसरीकडे जाहीरातींवर मात्र कोट्यवधी रुपये खर्च करत आहे, अशी टीका  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे सरकारच्या चुकीच्या धोणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या दहापटिने वाढल्या आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांनी चुकीचे पाऊल टाकू नये असे आवाहन करत आगामी निवडणुकीत भाजपाचा पराभव करून त्यांची जागा दाखवा, असंही नाना पटोले म्हणाले.

नागपूर हे देशातील सर्वात महागडं शहर आहे, या शहरात जे काही आणले जात आहे ते कर्जाने आणले आहे आणि नागपूरच्या लोकांना लुटलं जात आहे. विकासाच्या नावाखाली लुटण्याचं काम सुरु आहे. ऑऊट सोर्सिंगच्या माध्यमातून सरकारी नोकर भरती करण्याचा निर्णय या सरकारने घेतला आहे. लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासन असते पण ऑऊट सोर्सिंगमुळे जनतेला न्याय मिळणार नाही. पुलवामा स्फोटात वापरलेली स्पोटके नागपूरमधून गेली पण त्याचा छडा अद्याप लावला जात नाही. शेतकरी, तरुण, व्यापारी यांना बरबाद करण्याचे तसंच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान संपुष्टात आणण्याचे काम सुरु आहे असा आरोप पटोले यांनी केला. 

40 जवानांच्या मृत्यूला जबाबदार कोण? 
तर देशाच्या पंतप्रधानांवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत पण ते कोणत्याच प्रश्नाचे उत्तर देत नाहीत. अदानी राजकीय आशिर्वादानेच देशातील दुसऱ्या नंबरचा श्रीमंत व्यक्ती झाला. अदानी-मोदी संबंधावर भाजपा किंवा मोदींनी अद्याप उत्तर दिले नाही अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. भाजपाचे वरिष्ठ नेते आणि माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी अतिशय गंभीर आरोप केले. 14 फेब्रुवारी 2019 मध्ये 40 जवान शहिद झाले. पण त्यावर सत्यपाल मलिक यांना गप्प बसण्यास सांगण्यात आलं. 300 किलो स्फोटके असलेली वाहन फिरत होती, स्फोट झाला आणि 40 जवानांचा मृत्यू झाला याला जबाबदार कोण? याचे उत्तर मिळाले पाहिजे, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. 

देशात जे घडत आहे त्याकडे दुर्लक्ष केले तर ते परवडणारे नाही. महाविकास आघाडीची वज्रमूठ भक्कम ठेवून भाजपाला घरी बसवण्याचा निर्धार करा आणि आगामी निवडणुकीत भाजपा व मोदींना घरी बसवा, असं आवाहनही पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं.