नागपुरात ४ तास ढगफुटीसदृश पाऊस;४०० जणांना सुरक्षित स्थळी हलविले

लष्कराकडून मदतकार्य
तीन नागरिक मृत्युमुखी ; १४ जनावरे दगावली, अनेक घरात पाणी शिरले

नागपूर,,२३ सप्टेंबर /प्रतिनिधी :- शनिवारी रात्री २ ते पहाटे ५ वाजेपर्यंत शहरात विजांच्या कडकडाटासह ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. त्यामुळे सकल भागात पावसाचे पाणी शिरले. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाच्या सतर्कतेने एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कर आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने दुपारपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर आली. विविध ठिकाणी बचावकार्याद्वारे ४०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. या घटनाक्रमात दोन महिलांचा दुर्देवी मृत्यू झाला असून १४ जनावरे दगावली आहेत.

शनिवारी रात्री २ वाजता अचानक मुसळधार पाऊस सुरु झाला सतत दोन तास विजांचा कडकडाटासह ४ तासात १०९ मि.मी. पाऊस कोसळला. यातील पहिल्या २ तासांमध्ये ९० मि.मी.पाऊस झाला. परिणामी शहरातील अंबाझरी तलावातील पाण्याचा ओव्हर फ्लो होवून हे पाणी नागनदीत प्रचंड प्रवाहाने शिरले. नदीकाठावरील घरांमध्ये पाणी घुसले. अंबाझरी आणि वर्मा ले आऊट तसेच शंकरनगर भागात मोठ्या प्रमाणात पाणी वस्तीमध्ये शिरले.

या परिस्थितीचा सामना करण्याकरिता उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या मार्गदर्शनात प्रशासनाने पावले उचलली. शहरात तत्काळ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे (एसडीआरएफ) आणि लष्करांचे प्रत्येकी दोन दल दाखल झाले व बचावकार्य सुरु झाले. जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी नागपुरसह जिल्हयातील शाळा महाविद्यालयांना सुटी जाहीर केली. बचाव कार्यादरम्यान शंकरनगर भागातील मुक व कर्णबधिर शाळेच्या तसेच एलईडी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. यासोबतच शहराच्या सकल भागात पावसाचे पाणी साचल्याने अडकून पडलेल्या नागरिकांनाही बाहेर काढण्यात आले. ४०० नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढून प्रशासनाने तयार केलेल्या निवारा केंद्रात त्यांना पाठविण्यात आले.

या सर्व घटनाक्रमात घरात पावसाचे पाणी शिरल्याने महेशनगर परिसरातील मिराबाई पिल्ले (७० वर्षे) आणि तेलंगखडी परिसरातील सुरेंन्द्रगड येथील संध्या डोरे (८० वर्षे) यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर आणि मनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी यांनी पहाटे ५ पासून प्रत्यक्ष घटनास्थळाला भेटी देऊन बचाव कार्याचे नियंत्रण केले. आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनीही महानगर पालिका कार्यालयातील वार रुममधून परिस्थितीचा आढावा घतला. शहरातील विविध भागांना भेटी देत परिस्थितीचा आढावा घेतला. हजारीपहाड (सह्याद्री) भागात या उभय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट दिली. या भागात गोठ्यात बांधलेली चौदा जनावरे (सहा म्हशी, सहा गायी आणि दोन वासरे) मृत झाली आहेत. हजारी पहाड नाल्यातील पाणी गोठ्यात शिरल्याने ही दुर्दैवी घटना घडली. गोठ्याचे व जनावरांचे मालक योगेश वऱ्हाडकर, राजेश वऱ्हाडकर आणि मृणाल घोघल यांचे जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांनी सांत्वन केले. तसेच, प्रशासनाला या घटनेचा तत्काळ पंचनामा करण्याचे व आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले.

नंदनवन परिसरतील स्वातंत्र्य गल्ली क्र.४ व ६ झोपडपट्टी भागासही जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त यांनी प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी आमदार अभिजित वंजारी उपस्थित होते. याभागातील घरांची पडझड झाली आहे. घरांमध्ये व रस्त्यावर पावसाचे पाणी शिरले आहे. प्रशासनाच्यावतीने कुंभारपुरा जुना बगडगंज येथील नागरिकांना घरातुन सुरक्षित जागी जाण्याचे आवाहन करण्यात आले असून, धोकादायक घरातील नागरीकांना घरातुन सुरक्षित जागी हलविण्यात आले आहे. निवारा केंद्र सुरु करण्यात आले आहे. सक्करदरा गार्डन, मोरभवन बसस्थानकामध्येही पावसाचे पाणी शिरल्याचे चित्र होते.

दरम्यान, मनपा मुख्यालयातील ‘श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर’(सीओसी) ला आज आमदार चंद्रशेखर बावनकुळे, मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी, नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बीपी, माजी महापौर तथा उपमुख्यमंत्र्यांचे मानद सचिव संदिप जोशी यांनी भेट दिली तथा शहरात सर्वत्र लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून शहरातील परिस्थितीची पाहणी केली. मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने काही भागात पाणी शिरले आहे. पाणी साचलेल्या भागात कार्यवाही करण्यासाठी डॉ. चौधरी यांनी प्रशासनाला निर्देश दिले.

पुरापासून कायमस्वरूपी संरक्षण योजनेसाठी राज्य शासन निधी देणार – उपमुख्यमंत्री

नुकसान झालेल्या दुकानदारांना ५० हजार तर क्षतीग्रस्त घरांना १० हजार सानुग्रह अनुदान

 नागपूर दि.२३ : शनिवारी रात्री झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे नागपुरात उद्भवलेली पूर परिस्थिती अघटित असली तरी अशी घटना पुन्हा होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येईल. ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरले त्या कुटुंबाला १० हजार रुपये प्रत्येकी तर दुकानाचे नुकसान झालेल्यांना ५० हजार रुपये प्रत्येकी सानुग्रह अनुदान देण्यात येईल, अशी माहिती आज आढावा बैठकीनंतर देण्यात आली.

शनिवारी रात्री २ ते पहाटे ५ वाजेपर्यंत नागपूर शहरात विजांच्या कडकडाटासह ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. त्यामुळे सकल भागात पावसाचे पाणी शिरले. यामुळे सुमारे दहा हजार घरांना नुकसान पोहोचले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महानगरपालिकेमध्ये आज संपूर्ण पूर परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज झालेली घटना ही २५-३० वर्षात होणारा एखादा अघटीत घटनाक्रम आहे. अचानक झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या स्थितीत तीन नागरिक मृत्युमुखी पडले असून १४ जनावर दगावले आहेत. सर्व घटनाक्रमांचा पंचनामा सुरू करण्यात आला आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कर आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने अवघ्या तीन तासांमध्ये दुपारपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर आणली. अतिशय उत्तम प्रकारे प्रशासनाने बचाव कार्य केल्याचे त्यांनी सांगितले.

नागपूर शहरातील ज्या घरांमध्ये पाणी शिरले त्या घराची साफसफाई करण्याची जबाबदारी महानगरपालिकेने घेतली आहे. उद्यापर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल. कोणत्याही घरामध्ये गाळ साचणार नाही. निवारा केंद्रामध्ये असणाऱ्या नागरिकांच्या खानपानाची व्यवस्था करण्यात आली आहे. पूर्णतः क्षतीग्रस्त अशा प्रत्येक कुटुंबाला, घराला प्रत्येकी १० हजार रुपये सानुग्रह अनुदान, पूर्णत: नुकसान झालेल्या दुकानदारांना ५० हजार अनुदान तर पक्क्या दुकानाशिवाय ज्यांच्या हातगाडीचे, रस्त्यावरील ठेल्याचे नुकसान झाले आहे.त्यांनाही १० हजाराची मदत करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

अंबाझरी तलावाच्या मजबुतीसाठी कायमस्वरूपी संरक्षण भिंत, काही नवीन पुलांचे बांधकाम करण्याची सूचना महानगरपालिकेला करण्यात आली आहे. संपूर्ण बंधाऱ्याचे मजबुतीकरण करताना पाटबंधारे विभाग या कामांमध्ये एजन्सीचे काम करेल, राज्य सरकार यासाठी निधी उपलब्ध करून देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आज अनेक ठिकाणची वीज बंद करण्यात आली होती, बहुतेक ठिकाणी पुन्हा सुरु करण्यात आली आहे. 14 ट्रान्सफॉर्मर अजून सुरु केलेले नाहीत. मात्र हा निर्णय सुरक्षिततेच्या कारणाने घेण्यात आलेला आहे.  कुठलाही अनर्थ होऊ नये, म्हणून वीज बंद आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे. सकाळपर्यंत वीज पुरवठा सुरु करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पावसाची दाट शक्यता आहे. प्रशासन उद्याच्या प्रतिबंधात्मक तयारीसाठी सज्ज आहे. त्यामुळे उद्या जर पाऊस असेल तर गरज नसताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.उद्या नुकसान झालेल्या काही ठिकाणी भेट देणार असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.

या पुरामध्ये १४ जनावरे दगावली. पशुपालक योगेश वऱ्हाडकर यांना या बैठकीपूर्वी स्वयंसेवी संस्थेच्यावतीने एक लक्ष रुपयाचा धनादेश श्री. गडकरी व श्री. फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आला.

या बैठकीला आमदार प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार,मनपा आयुक्त डॉ. अभीजित चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्यासह जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.