मला ईडीने कुठलाही दिलासा दिला नाही : अजित पवार

मुंबई,१२  एप्रिल / प्रतिनिधी :-  महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या घोटाळ्याप्रकरणी इडीने आरोपपत्र दाखल केलं आहे. यामध्ये अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचं नाव नसल्याची माहिती मिळते आहे.
 
अजित पवारांशी संबंधित कंपनीविरोधात दोषारोपपत्र दाखल झालं आहे. मात्र प्रत्यक्ष अजित पवारांचं नाव नाही. दरम्यान याप्रकरणी तपास सुरु असल्याचं ईडीने कोर्टात सांगितलं आहे. त्यामुळे पुरवणी दोषारोपपत्रही दाखल होऊ शकतं अशी ईडीची माहिती आहे.
 
त्यामुळे ईडीने आत्तापर्यंत एकदाही अजित पवारांना चौकशीसाठी समन्स बजावलेलं नाही. अजित पवार यांनी मात्र नाव वगळ्याचं वृत्त फेटाळलं आहे. ईडी प्रकरणाची चौकशी सुरू आहे. अद्याप क्लीन चीट दिलेली नाही. माझ्या माहितीनुसार चौकशी सुरु आहे असं अजित पवार म्हणाले आहेत.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यामुळे अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या घोटाळ्याची चौकशी जवळपास बंद झाली. जवळपास 25 हजार कोटींचा हा घोटाळा आहे. मात्र, 9-10 महिन्यापूर्वी राज्यात सत्तांतर झाल्यानंतर चौकशीला पुन्हा वेग आला आहे. याप्रकरणी ईडीने जरंडेश्वर साखर कारखान्याची 65.75 कोटी रुपयांची मालमत्ताही जप्त केली होती.

19 एप्रिलला विशेष सुनावणी

ईडीने अजित पवारांशी संबंधित या कंपनीला आरोपी बनवले आहे. कंपनीच्या विरोधात आरोपपत्रही दाखल केले आहे. त्यामुळे अजित पवार यांचीही चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आतापर्यंत ईडीने या प्रकरणी अजित पवार यांची एकदाही चौकशी केली नाही.

19 एप्रिल रोजी ईडीच्या विशेष न्यायालयात सुनावणी होणार आहे. सुनावणीत नेमके काय होते?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, या प्रकरणाचा अजून तपास सुरू आहे. त्यामुळे गरज पडल्यास ईडी पुन्हा पुरवणी आरोपपत्र दाखल करू शकणार आहे. त्यामुळे पुढील आरोपपत्रात अजित पवार यांचे नाव येणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष आहे.