पिके गेली,घरे पडले, मुकी जनावरे दगावली, सरकार शेतकऱ्यांचा अंत पाहणार का?

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली गारपिटीची पाहणी

छत्रपती संभाजीनगर,१०  एप्रिल / प्रतिनिधी :-  पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे हैराण झालेला बळीराजा आता गारपीट आणि अवकाळीने संकटात सापडला आहे.हातातोंडाशी आलेला घ्यास निसर्गाने हिरावून घेतला आहे. आता शेतकऱ्यांना मदत नाही केली तर तो कुठलं पाऊल उचलेल हे सांगता येत नाही, त्यामुळे सरकारने गांभीर्याने घ्यावे. पिके गेली, घरे पडले, मुकी जनावरे दगावली, सरकार शेतकऱ्यांचा अंत पाहणार का? नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीनं पंचनामे करून आर्थिक मदत द्या, अशी मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली.      

कन्नड तालुक्यातील जेहुर, औराळा, चापानेर विभागातील गावांत झालेल्याअवकाळी पाऊस आणि गारपिटीची त्यांनी पाहणी केली.

रब्बी आणि खरीप पिकांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. पूर्वीचे कर्ज फेडण्यासाठी पुन्हा काढलेले कर्ज फेडावं कसं? मायबाप सरकार मदत करणार का? असा सवाल बळीराजा उपस्थित करत आहेत.

कांदा, गव्हु, उन्हाळी मका, बाजरी, फळबागा, भाजीपाला, द्राक्षे, आंबे, बीजवाई कांदा जमीनदोस्त झाली आहे. मुक्या जनावरे दगावली. पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीची नुकसानभरपाई झाली नाही. आता पुन्हा प्रशासन आणि अधिकारी यांच्याकडे कागदपत्र घेऊन चकरा मारावे लागणार आहे.

मुंगसापूर येथील शेतकरी शिवाजी दाभाडे, जनार्दन,  दाभाडे यांचा संसार उघडा पडला. पत्र उडाली, संसारउपयोगी साहित्याचे नुकसान झाले. अनेकांचे गोठे उडाले, कांदाचाळीत पाणी गेले, आता तरी सरकारने जागे होऊन मदत करावी, असे आवाहन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले.

यावेळी आमदार उदयसिंह राजपूत, तालुकाप्रमुख संजय मोटे पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब शिंदे, उपतालुकाप्रमुख गितराम पवार, युवासेना तालुका अधिकारी योगेश पवार, रामहारी पवार, उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार संजय वाडकर, तलाठी, ग्रामविकास अधिकारी,  अशोक दाबके, धीरज पवार, संदीप सपकाळ पाटील, बाबासाहेब मोहिते, गणेश शिंदे आदींसह नागरिक उपस्थित होते.

दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे अश्रू फुसा – उदयसिंह राजपूत

विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन

मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने बळीराजा संकटात सापडला होता. ती जखम ताजी असतांना गारपिटीने होत्याचे नव्हते केले. अनेकांना आता रडल्याशिवाय पर्याय राहिला नाही. रात्र रात्र बळीराजा झोपला नाही. प्रशासन आणि सरकारने आता तरी शेतकऱ्यांना न्याय द्यावा, त्यांचे अश्रू पुसावे, अशी मागणी आमदार उदयसिंग राजपूत यांनी केली.

९ एप्रिल रोजी झालेल्या नुकसानीची पाहणी करून तातडीने विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर,  जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडे यांनी भेट घेऊन निवेदन दिले.