अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल तातडीने पाठवावा

उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीने झालेले नुकसान आणि कोविडचा मंत्री अमित देशमुख यांनी घेतला आढावा
  • कोविड-१९ उपचारासाठी डॉक्टरांची उपलब्धता करून देण्यात येणार
  • प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयासाठी उपलब्ध जागेचा अहवाल तातडीने सादर करावा

लातूर, दि. 20 : वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी मंगळवारी उस्मानाबाद येथे जाऊन जिल्ह्यात नुकतीच झालेली अतिवृष्टी तसेच कोविड-१९ संदर्भाने आढावा घेतला. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करावा, त्याचबरोबर कोविड-१९ च्या संदर्भाने उपचार आणि जनजागृती करताना दुर्लक्ष होऊ नये, असे निर्देशही त्यांनी दिले.

यावेळी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नेवाळे, धीरज पाटील, श्री. शेरखाने, विश्वास शिंदे, यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे  झालेल्या एकूण नुकसानीची माहिती घेतल्यानंतर अमित देशमुख यांनी प्रशासकीय यंत्रणेने शेती तसेच शेतामधील पिके अवजारे व इतर मालमत्तेच्या झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावे, विमा कंपन्यांशी संपर्क करावा आणि सर्व अहवाल तातडीने शासनाला सादर करावे, असे स्पष्ट निर्देश दिले. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे असून त्यांना आधार देणे ही शासनाची प्राथमिकता आहे असेही त्यांनी सांगितले. बैठकी दरम्यान अमित देशमुख यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचाही आढावा घेतला. कोविंड रुग्ण संख्येचा आलेख खाली येत असला तरी यासंदर्भातील उपचार आणि जनजागृतीसंदर्भात कोणत्याही प्रकारची दिरंगाई किंवा दुर्लक्ष होऊ नये अशा स्पष्ट सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

कोविड-१९ रुग्णांवरील उपचारासाठी उस्मानाबादमध्ये अधिक डॉक्टर्सची गरज असल्याचे निदर्शनास आले असल्याने वैद्यकीय शिक्षण विभाग व आरोग्य विभागाने या ठिकाणी डॉक्टर्स उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी सूचना केल्या.उस्मानाबाद येथील नियोजित वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य जागा निवडून तातडीने प्रस्ताव सादर करण्याची सूचनाही यावेळी त्यांनी केली.

अतिवृष्टीने पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने 48 तासात पूर्ण करावेत – पालकमंत्री अमित देशमुख
अतिवृष्टीने पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने 48 तासात पूर्ण करावेत – पालकमंत्री अमित देशमुख

लातूर, दि. 19 : जिल्ह्यात मागील चार-पाच दिवसापूर्वी अतिवृष्टी झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाने 48 तासात पूर्ण करावे.  शेतकऱ्यांनी खचून न जाता धीर धरावा शासन पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री श्री. देशमुख बोलत होते. यावेळी लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, महापालिका आयुक्त देविदास टेकाळे उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. देशमुख म्हणाले, कालच निलंगा व औसा तालुक्याच्या काही गावात अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाची पाहणी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन केली. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच घरांची पडझड, जनावरांची जीवितहानी आणि रस्ते व पुलांचे झालेले नुकसान याचे प्रशासनाने त्याचे सर्वेक्षण पूर्ण केलेले आहे. शेती पिकाचे पंचनामे पुढील 48 तासात पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

अतिवृष्टीने, पुरामुळे शेतजमिनीचेही नुकसान झालेले आहे. माती वाहून गेल्याने काही ठिकाणी जमिनी पेरणीयोग्य नाहीत. अशा शेतकऱ्यांनाही शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील जिल्ह्यातील सर्वच सिंचन प्रकल्पांमध्ये समाधानकारक साठा असून सद्यस्थितीत मांजरा धरणात 90 टक्के तर निम्न तेरणा प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

सोनखेड व शिवणी भागात जी परिस्थिती उद्भवली तसेच बॅरेजमधील पाणी वाहून जाऊन शेतकऱ्यांच्या शेतीचेही नुकसान झाले त्याबाबत चौकशी करण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आलेले असून चौकशीनंतर जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी दिले.