ओहरगावात बॅनर फाडल्याप्रकरणी आठ आरोपींचा  नियमित जामीन अर्ज नामंजूर 

छत्रपती संभाजीनगर,७  एप्रिल / प्रतिनिधी :-  जटवाडा रोडवरील ओहरगावात बॅनर फाडल्याप्रकरणी दोन गटात झालेल्या राड्यात हर्सुल पोलिसांनी अटक केलेला आठ आरोपींनी सादर केलेला नियमित जामीन अर्ज प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एम.एम. माळी यांनी शुक्रवारी दि.७ एप्रिल रोजी नामंजूर केला.

भास्‍कर लिंबाजी पिठोरे (२६), अजय दिनानाथ भालकर (३४), मोसीन खान मोईन खान पठाण (३३), मुजफ्फर मन्‍सुर पठाण (२५), फयाज हारुण खॉं पठाण (१९), मोसीन रशिद खॉं पठाण (२२), मु‍स्‍तकिन नसीर खॉं पठाण (३२) आणि खन समीर अकबर ऊर्फ एमडी समीर (२३, सर्व रा. ओहरगाव) अशी आरोपींची नावे आहेत.

गुन्‍ह्यात यापूर्वी काही आरोपींनी सादर केलेला नियमीत जामीन अर्ज न्‍यायायलाने नामंजूर केलेला आहे. आरोपींच्‍या साथीदारांना अटक करयची आहे. गुन्‍ह्यात वापरलेली हत्‍यार हस्‍तगत करायची आहेत. आरोपींना जामीन दिल्यास पुन्‍हा जातीय दंगल उसळण्‍याची शक्यता नाकरता येत नसल्याने सहायक सरकारी वकील शशिकांत ईघारे यांनी आरोपींच्‍या जामीन अर्जाला विरोध केला होता.

जटवाडा रोडवरील ओहरगावात ३० मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्‍या सुमारास गावातील रोडच्‍या कडेला लावलेले बॅनर फाडल्याने तणाव निर्माण झाला होता. मात्र ते प्रकरण आपसात मिटवण्‍यात आले. दुसर्या दिवशी ३१ मार्च रोजी सकाळी बॅनर फाडण्‍याच्‍या कारणावरुन दोन्‍ही गट समोरा-समोर येवून जोरदार भांडण झाली, दगडफेक करण्‍यात आली. प्रकरणात दोन्‍ही गटांनी दिलेल्या फिर्यादीवरुन हर्सुल पोलिस ठाण्‍यात परस्‍पर विरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.