छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या घटनेस एमआयएमसह भाजप जबाबदार-विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

छत्रपती संभाजीनगर,३० मार्च  / प्रतिनिधी :-  छत्रपती संभाजीनगर येथे मध्यरात्री झालेल्या दोन गटांच्या वादातून शहारत अशांतता पसरवण्याची घटना घडली. या घटनेला सर्वस्वी एमआयएमसह भाजप जबाबदार असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

   छत्रपती संभाजीनगर येथील श्रीराम मंदिर किराडपुरा परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या वादातून करण्यात आलेल्या जाळपोळ, झालेल्या घटनास्थळाची पाहणी करत परिस्थितीचा दानवे यांनी आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते.

 एमआयएम भाजपने  मागच्या काळात दोन समाजात द्वेष रुजवण्याचा काम केलं आहे, त्याचा हा परिणाम आहे. 

जे संभाजी नगर गुण्यागोविंदाने राहण्याच व विकासाच्या दृष्टीने पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय तेथील वातावरण धगधगत ठेवण्याच काम हे राजकीय पक्ष करत आहेत. याबाबत  सभागृहातही आवाज उठविला होता. या परिस्थितीबाबत पोलिसांनाही अवगत केले होते असे दानवे म्हणाले. 

   तसेच पोलिसांवर हल्ले होणं, पोलिसांचे वाहन जाळणे ही बाब निषेधार्ह आहे. त्यामुळे पोलिसांनीही अशा समाजकंटकांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

  स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी हे प्रकार होत आहेत. दंगल होण्यास हे पक्ष जबाबदार आहेत. मात्र जनता आता शहाणी झाली आहे ती अशा गोष्टींना खतपाणी घालणार नाही असे म्हणत *अंबादास दानवे यांनी नागरिकांनी शांतता, संयम पाळवा. घाबरण्यासारखे काहीच नाही, रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे आवाहन केले आहे.*