पृथ्वीने केली कमाल; निवडसमितीला दिले त्रिशतकाने उत्तर

क्रिकेटपटू पृथ्वी शॉने रणजी ट्रॉफीमध्ये तडाखेबाज फलंदाजी करत इतिहास रचला

गुवाहाटी,११ जानेवारी  / प्रतिनिधी :- रणजी ट्रॉफी २०२२ – २०२३च्या हंगामात क्रिकेटपटू पृथ्वी शॉने ऐतिहासिक खेळी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने आसाम विरुद्ध खेळताना पहिले त्रिशतक झळकावले. त्याने ३२६ चेंडूंमध्ये ३०० धावांचा टप्पा पार केला. विशेष म्हणजे त्याने ३८२ चेंडूंमध्ये ३७९ धावांची दमदार खेळी केली. याचसोबत तो रणजीच्या इतिहासात एका डावामध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. तसेच, रणजी ट्रॉफीच्या इतिहासात मुंबईकडून सर्वोच्च वैयक्तिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरला.

मुंबई विरुद्ध आसाममध्ये सुरु असलेल्या रणजी सामन्यात पृथ्वीने पहिल्या दिवसापासूनच आक्रमक फलंदाजी केली. ३७९ धावांची खेळी करत त्याने रणजीमध्ये इतिहास रचला. तसेच, यावेळी त्याने पहिल्या विकेटसाठी १२३ धावांची भागीदारी केली तर त्यानंतर अजिंक्य रहाणेसोबत तिसऱ्या विकेटसाठी तब्बल ४०१ धावांची भागीदारी केली. या खेळीमध्ये त्याने ४९ चौकार आणि ४ षटकार मारले. त्याने रणजीमध्ये दुसऱ्या क्रमांकांची सर्वोत्तम खेळी केली. त्याने संजय मांजरेकरचा ३२ वर्षे जुना विक्रम मोडला. मांजरेकर यांनी १९९१ मध्ये हैदराबादविरुद्ध मुंबईकडून खेळताना ३७७ धावा केल्या होत्या.

आसामच्या रियान परागने पृथ्वीला बाद केल्यामुळे त्याचा सर्वाधिक धावांचा विक्रम मात्र हुकला. १९४८ – १९४९च्या रणजी ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राचे भाऊसाहेब निंबाळकर यांनी ४४३ धावांची रणजीच्या इतिहासातील सर्वोत्तम वैयक्तिक खेळी केली होती. मात्र, पृथ्वीने या खेळीमधून टीकाकारांचे आणि निवडसमितीचे लक्ष वेधून गेहटले आहे. त्याने विजय मर्चंट, व्हीव्हीएस लक्ष्मण, चेतेश्वर पुजारा आणि सुनील गावसकर अशा दिग्गज फलंदाजांना मागे टाकले आहे. त्यामुळे आतातरी त्याला भारतीय संघात स्थान मिळेल का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींकडून केला जात आहे.