जी-20 परिषदेच्या नियोजनाबाबत मुख्य समन्वयक धरित्री पटनायक यांनी घेतला आढावा

औरंगाबाद,१६ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- जी-20 आंतरराष्ट्रीय परिषदेच्या अनुषंगाने शहरात विमेन्स 20 परिषद होणार आहे. या परिषदेसाठी अनेक देशाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली आणि विमेन्स 20 परिषदेच्या मुख्य समन्वयक धरित्री पटनायक यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजनाबाबत आढावा घेण्यात आला.

          जी-२० परिषद बैठकीच्या अनुषंगाने विविध समित्या नेमण्यात आल्या आहेत. या समितींच्या माध्यमातून करण्यात आलेल्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी आणि मुख्य समन्वयकांनी आढावा घेतला.

नियोजनाबाबत कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहू नयेत, प्रत्येकांनी आप-आपल्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी संबंधितांना  दिले.

          या बैठकीस महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त बी.बी.नेमाने, स्मार्ट सिटीचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी सौरभ जोशी, उपायुक्त अपर्णा थेटे, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, मनपा शहर अभियंता ए.बी. देशमुख, सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहायक संचालक श्रीमती सुनीता आसवले-मुंडे व कोरयोग्राफर विनायक सईद आदी उपस्थित होते.

·        जी-20 च्या पार्श्वभूमीवर धरित्री पटनाईक यांची वेरुळ भेट

          या भेटी दरम्यान त्यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळच्या वेरुळअभ्यागत केंद्रास भेट दिली. यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे यांनी अभ्यागत केंद्राची सविस्तर माहिती दिली. जी-20 परिषदेत येणारे शिष्टमंडळ वेरुळ येथे भेट देणार असून या ठिकाणी त्यांना महाराष्ट्राच्या संस्कृतीची आणि औरंगाबाद शहराच्या ऐतिहासिक बाजूची ओळख करून देण्यात येणार आहे. वेरुळ अभ्यागत केंद्रामध्ये असलेल्या सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.  त्याचबरोबर या ठिकाणी पाहुण्याच्या जेवणासाठी खास महाराष्ट्रीयन पद्धतीने व्यवस्था करण्यात येणार आहे