शिर्डीच्या साई बाबांचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; १० जणांचा मृत्यू

नाशिक,१३ जानेवारी / प्रतिनिधी :- नाशिकच्या पाथेरजवळ शिर्डीला जाणाऱ्या एका खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये १० जणांचा मृत्यू झाला असून ४० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये २ लहान मुलांचादेखील समावेश असल्याची माहिती देण्यात येत आहे. 

ठाणे आणि अंबरनाथ परिसरातील सुमारे ५० प्रवासी बसमधून प्रवास करत होते. उल्हासनगरमधून १५ बसेस शिर्डीकडे निघाल्या होत्या. त्यातील एका बसचा अपघात झाला. या अपघातांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच, जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देशदेखील त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

सिन्नर- शिर्डी महामार्गावर पाथेर शिवारातील ईशानेश्वर मंदिराच्या कमानीजवळ सकाळच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. पाथेर ते पिंपळवाडी येथील टोलनाक्यादरम्यान एकेरी वाहतूक सुरू होती. हा अपघात इतका भीषण होता की ट्रक आणि बसचा चक्काचूर झाला. या अपघानंतर मुख्यमंत्रीनीही दखल घेत नाशिक विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून याविषयी अधिक माहिती घेतली. जखमी प्रवाशांना तातडीने शिर्डी नाशिक या ठिकाणी हलवून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू करावेत, असे आदेश दिले. त्याचसोबत या अपघाताची चौकशी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.