देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेच पाहिजेत; भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

नागपूर ,१८ डिसेंबर/ प्रतिनिधी :-महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड केले आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पडून शिंदे गट आणि भाजपचे नवे सरकार आले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार, अशा चर्चा असतानाच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद देण्यात आले. त्यानंतर भाजपचे काही नेते यावर नाराज असल्याच्याही चर्चा सुरु झाल्या. नुकतेच भाजपच्या बड्या नेत्याने एक वक्तव्य केले आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आलबेल नसल्याच्या चर्चा सुरु झाल्या. ‘ मी प्रदेशाध्यक्ष असतानाच मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस यांना बघायचे आहे’ असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका जाहीर कार्यक्रमात केले.

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जातीपातीच्या बाहेर निघालेले नेते आहेत. न्यायासाठी त्यांनी प्रत्येकाला मदत केलेली आहे. जो-जो समाज त्यांच्याकडे गेला, त्यांच्यासाठी त्यांनी काम केले. मराठा, धनगर, ओबीसी असतील अशा सर्वांसाठी त्यांनी कामे केली आहेत. त्यामुळे आपली सर्वांची जबाबदारी आहे, की मी भाजपाचा प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत. त्यासाठी आपण सर्वांनी त्यांच्या पाठिशी उभे राहणे गरजेचे आहे. फक्त तेच महाराष्ट्राचे भविष्य बदलू शकतात.”

नागपुरात संत संताजी जगनाडे महाराज यांच्या स्मारक आणि आर्ट गॅलरीचा भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले की, आपली ही जबाबदारी आहे की पुन्हा एकदा २०१४ ते २०१९चा काळ महाराष्ट्रात आला पाहिजे. त्यानंतर त्यांनी नागरिकांना संबोधन करताना, ‘पुढच्यावेळी मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर कोणाला बघायला आवडेल?’ असा प्रश्न विचारला. यावर नागरिकांमधून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाच्या घोषणा झाल्या. यावर ते पुढे म्हणाले की, आता आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागे उभे राहण्याची वेळ आहे.