सर्व विभागांच्या समन्वयातून कृषी महोत्सव यशस्वी करा- जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय

औरंगाबाद,१३ डिसेंबर / प्रतिनिधी :- सिल्लोड येथे राज्यस्तरीय कृषि व सांस्कृतिक महोत्सवाचे 1 ते 5 जानेवारी 2023 या कालावधी आयोजन करण्यात आले असून या महोत्सवात  शासनाच्या प्रत्येक विभागाने सक्रिय सहभाग घ्यावा, नागरिकांना उपयुक्त व विकास योजना, उपक्रमांची माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी प्रत्येक विभागाने  किमान एक स्टॉल लावून विभागांच्या योजनांची माहिती देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय यांनी आढावा बैठकीत दिले.

            यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे, आत्मा नियामक मंडळाचे प्रकल्प उपसंचालक अनिल साळेुंखे , कृषि उपसंचालक श्री. दिवटे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बी.एस. तौर, जिल्हा अग्रणी बँकेचे अध्यक्ष मंगेश केदार, सहायक आयुक्त कौशल्य विकास व रोजगार कार्यालयाचे सुरेश वराडे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष साबळे यांच्यासह सर्व कार्यालयाचे कार्यालय प्रमूख उपस्थित होते.

            सिल्लोड कृषि महोत्सवात, सहकार पणन, पशुसंवर्धन, शिक्षण, जलसंधारण, उद्योग, समाज कल्याण न्यायवैद्यक प्रयोग शाळा यांच्यासह सर्व विभागाने आपआपल्या विभागांच्या योजनांची अंमलबजावणी झालेल्या उपक्रमाची माहिती स्टॉलच्या माध्यमातून शेतकरी, नागरिकांना उपलब्ध करुन देण्याच्या सूचना पाण्डेय यांनी दिल्या.

            जिल्हा ग्रंथालय कार्यालयांनी विविध भाषेतील पुस्तक प्रकाशन संस्थांचे स्टॉल लावण्यासाठी समन्वय करावा, पुस्तक प्रदर्शनाबरोबरच ‘पुस्तदान’ उपक्रमातून नागरिकांकडून पुस्तक जमा करुन ते पुस्तके गरजू वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करावी. तसेच ऑनलाईन लायब्ररी विषयी विद्यार्थ्यांना माहिती उपलब्ध करुन देवून जगात महत्वाच्या ग्रंथालयाची माहिती ऑनलाईन पध्दतीने महोत्सावात भेट देण्याऱ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन द्यावी. तसेच वाचन, ग्रंथालय, तंत्रज्ञान यांचे महत्व सांगण्यासाठी स्टॉलमध्ये व्यवस्था करण्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. 

 

            मोठ्या संख्येने होणाऱ्या नागरिकांच्या गर्दीचे महत्व लक्षात घेता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महावितरण,आपतकालीन नियंत्रण कक्ष, आरोग्य यंत्रणेने मदत केंद्र स्थापण करावे. तसेच शालेय शिक्षण विभागाने प्रत्येक तालुक्यातुन विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल कृषि महोत्सव कालावधीत आयोजित करुन विद्यार्थ्यांना प्रत्येक स्टॉलवर माहिती सांगण्याचे नियोजन करावे. बँकांनी नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध सुविधा व योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक प्रक्रियाची माहितीचे स्टॉलच्या माध्यमातून उपलब्ध करुन द्यावी. तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त जिल्हा माहिती कार्यालय व विभागीय कार्यालयाने प्रदर्शनाचे आयोजन करावे, तसेच कृषि महोत्सवात होणाऱ्या उपक्रमांची माहिती विविध प्रसार मध्यमातून प्रसिद्ध करावी.

            कृषि क्षेत्रातील  उत्तम काम करण्याऱ्या शेतकरी बांधवांसाठी विविध आठ विभगात देण्यात येणाऱ्या पुरस्कारांसाठी प्रेवशिका प्राप्त उमेदवारांची निवड समितीमार्फत निवड करुन पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचा सन्मान कार्यक्रम कृषि विभागाने आयेजित करावा. यामध्ये तज्ज्ञ, अनुभवी शेतकऱ्यांचा संवाद, मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन कृषि महोत्सवात करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय यांनी सांगितले.