नोटबंदी व जीएसटीमुळे देशातील लहान- छोट्या उद्योगांवर मोठा आघात :राहुल गांधींचा घणाघात

नांदेड ​ ,८ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- नोटाबंदीला 6 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. 2-3 अब्जाधीश मित्रांना फायदा व्हावा यासाठी हे काम करण्यात आल्याचं राहुल म्हणाले.”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्याच दिवशी 6 वर्षांपूर्वी रात्री 8 वाजता टीव्ही वर येऊन हजार व पाचशे रुपयांच्या नोटा बंद केला. तर जीएसटी चुकीच्या पद्धतीने लागू करून देशातील लहान, छोट्या उद्योगांवर मोठा आघात केला. नरेंद्र मोदी यांच्या या दोन्ही निर्णयाने देशाची अर्थव्यवस्था उद्धवस्त केली.” असा घणाघाती हल्ला खासदार राहुल गांधी यांनी आज केला.

विरोधी पक्षांनी नोटाबंदीला आर्थिक नरसंहार आणि गुन्हेगारी कृत्य म्हणून संबोधले होते. राहुल गांधी ट्विट करून म्हणाले की, नोटाबंदी हे पेपीएमने त्यांच्या २-३ अब्जाधीश मित्रांना लघु आणि मध्यम व्यवसायांचे उच्चाटन करून भारताच्या अर्थव्यवस्थेवर मक्तेदारी निर्माण करावी यासाठी जाणीवपूर्वक उचललेले पाऊल होते. यावेळी राहुल यांनी एक व्हिडीओही ट्विट केला आहे.

याआधी राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटलं होतं की, “काळा पैसा आला नाही, फक्त गरिबी आली, अर्थव्यवस्था कॅशलेस झाली नाही, ती कमजोर झाली. दहशतवाद नव्हे, कोट्यवधींचे छोटे उद्योग आणि रोजगार गेले, नोटाबंदीत ‘५० दिवस’ देण्याचे आश्वासन देऊन अर्थव्यवस्थेचेच डिमोलिशन केल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं.

भारत जोडो यात्रेच्या महाराष्ट्रातील दुस-या दिवशीची पदयात्रेची सांगता भोपाळा गाव येथील छोटेखानी सभेने झाली. यावेळी नरेंद्र मोदी यांच्यावर राहुल गांधी यांनी टीकास्त्र सोडले.

लाखो लोक बेरोजगार

राहुल गांधी म्हणाले की, देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेले छोटे, मध्यम, लघु उद्योगाचे मोठे नुकसान झाले, लाखोंच्या संख्येने उद्योग बंद पडले, लाखो रोजगार गेले. तर नोटबंदीच्या लहरी निर्णयानेही नुकसान झाले. दोन्ही निर्णयाने देशाचे मोठे नुकसान व केवळ दोन-तीन उद्योगपतींचा फायदा झाला.