लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी युवकांनी मतदान करावे –  मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

मतदान जागृतीसाठी निवडणूक विभागाचे विविध उपक्रम

नांदेड ,१६ ऑगस्ट /प्रतिनिधी :- देश घडवण्याची ताकद मतदारांमध्ये असते.  यात युवा मतदारांनी राष्ट्र सेवा म्हणून आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासह मतदान साक्षरतेसाठीही सहभाग घेणे आवश्यक आहे. लोकशाहीत युवकांची भूमिका ही प्रत्येक देशात सिध्द झालेली आहे. अनेक देशात युवकांनी क्रांती केली आहे. भारतातही आपला युवा वर्ग अत्यंत सक्षम असून मतदारांच्या नोंदणीत असलेले मतदानाचे प्रमाण वाढविणे हे सुद्धा कोणत्या क्रांती पेक्षा कमी नाही, असे प्रतिपादन राज्याचे अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले. महात्मा गांधी मिशन अभियांत्रिकी महाविद्यालय व निवडणूक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, उपजिल्हाधिकारी (निवडणूक)  संगिता चव्हाण, उप प्राचार्य एस. एल. कोटगिरे, संगणक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. ए. एम. राजुरकर, तहसिलदार संजय वारकड, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार व विद्यार्थी-विद्यार्थीनी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

राज्यातील युवकांपर्यत निवडणूक विभागाची भूमिका पोहचावी, युवकांच्या मनातील मतदान प्रक्रियेविषयी असलेल्या विविध शंकाचे समाधान व्हावे, मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या मतदार साक्षरता चळवळीत युवकांचा सहभाग वाढावा याउद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला होता. प्रकट मुलाखतीच्या माध्यमातून राज्याचे अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी  श्रीकांत देशपांडे यांनी लोकशाही प्रक्रियेपासून, सुशासन ते मतदानाची पवित्रता आणि युवा मतदारांच्या मतदानापर्यत विविध प्रश्नांना उत्तरे दिली.

देशाच्या प्रगतीपासून ते गावपातळीपर्यतच्या समस्यापर्यत प्रत्येकजण हा विविध प्रकारच्या अत्यंत जबाबदारीने चर्चा करीत असतो. प्रत्येकाला विकास कामात बदल हवा असतो. ही प्रक्रिया आपल्या मतदानाच्या हक्कातून,कर्तव्यातून आपण पार पाडू शकतो. मतदान करणे हे जेवढे प्रत्येक नागरिकांचे मुलभूत कर्तव्य आहे तेवढेच त्याचे पावित्र्य जपणे हे देखील अत्यंत मोलाचे आहे असे त्यांनी सांगितले. मतदार जागृतीसाठी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला१ ८दिवसांची विद्यार्थ्यांची मतदार जागृती दिंडी काढली जाते. विविध प्रतिथयश शैक्षणिक संस्थामधील गुणवंत विद्यार्थ्यांना, कलाकारांना, चित्रकारांना मतदान साक्षरतेच्या चळवळीला अधिक रचनात्मक करण्यासाठी निवडणूक विभाग प्रोत्साहन देत आहे. यात विद्यार्थ्यांनी आपल्या संकल्पना वापरुन जास्तीत जास्त नव मतदार वाढविण्यासाठी भर द्यावा, असे आवाहन श्रीकांत देशपांडे यांनी केले.

आजच्या स्थितीत देशात 94 कोटी 50 लाख 25 हजार 694 मतदार आहेत. मतदारांना मतदानाच्या प्रक्रीयेत सहभागी करुन घेणे हे आव्हान असून त्यासाठी निवडणूक विभाग प्रयत्नशिल आहे.  यासाठी विभागाकडून विविध उपक्रम, स्पर्धा राबविण्यात येतात. तसेच युवा मतदारांचा सहभाग वाढविण्यासाठी निवडणूक विभागाने सन 1980 मध्ये मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी मतदाराचे वय 21 वरुन 18 केले आहे. मतदानाचा अधिकार मिळूनही अनेक युवक मतदानाचे कर्तव्य बजाविण्यापासून टाळाटाळ करत असल्याची खंतही त्यांनी बोलून दाखविली.

समाजातील प्रत्येक घटकाला निवडणूक प्रक्रीयेत सामावून घेतले जावे यासाठी राज्याचे अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी राज्यात एक वेगळी दिशा दिली असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.  दिव्यांग, तृतीयपंथी, भटके, विमुक्त आदींचा मतदान प्रक्रीयेत सहभाग वाढावा यासाठी ते वाडी-वस्तीवर जावून मतदारांशी संपर्क साधत आहेत. यामुळे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वेगळा संदेश पोहचला असून स्थानिक पातळीवरील बीएलओ पासून मतदानाची एक नवी साक्षरता चळवळ सुरु झाल्याचे, जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी सांगितले.

जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी श्रीकांत देशपांडे यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थी तुषार व ईश्वरी यांनी मतदानाचे महत्त्व विषद केले.  सतपालसिंग गिल यांनी सूत्रसंचालन केले. राहुलसिंह बिसेन यांनी आभार मानले.

मुख्य निवडणूक अधिकारी पोहोचले थेट धनेगाव येथील भटक्या विमुक्तांच्या वस्तीवर

प्रत्येक भटक्या विमुक्तांना मतदार यादीत समाविष्ट करु

मतदान कार्डासमवेत भटक्या विमुक्तांपर्यत विविध शासकीय योजनाही पोहोचविणार

विकासाच्या संकल्पनेत सर्वाचा विकास यासाठी शासन कटिबद्ध आहे. समाजातील सर्वच घटकांचे प्रतिबिंब हे शासकीय योजनांसह मतदान प्रक्रियेच्या, मतदानाच्या हक्कापर्यत अभिप्रेत आहे. रोजच्या जगण्यासाठी हातावर पोट घेवून संघर्ष करणाऱ्या भटक्या विमुक्तांना मतदानाच्या हक्कासह विविध शासकीय योजनाही प्रभावी पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्नशिल असल्याचे, श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले.  धनेगाव येथील पाल टाकून राहणाऱ्या भटक्या विमुक्तांच्या वस्तीवर भेट देवून त्यांनी संवाद साधला.

यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) संगिता चव्हाण, तहसीलदार संजय वारकड, भटके व विमुक्त जाती जमातीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष देविदास हादवे, धनेगावचे सरपंच गंगाधर शिंदे व पदाधिकारी उपस्थित होते.

प्रशासनात काम करणारे अधिकारी हे तुमच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत. ते आपले आहेत आपल्यासाठी ज्या योजना आहेत त्या योजना तुमच्या सकारात्मक सहभागाशिवाय साकार होवू शकणार नाहीत. ज्या योजना आहेत त्याकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून लाभ घेण्याचे आवाहन श्री. देशपांडे यांनी केले. यावेळी 71 व्यक्तींना मतदान फार्म भरुन घेतले, 107 व्यक्तींना जात प्रमाणपत्र, 10 व्यक्तींना रेशन कार्ड, 40 व्यक्तींची आधार नावनोंदणी, 8 व्यक्तींना संजय गांधी फॉर्म, 7 व्यक्तींना उत्पन्नाचे प्रमाणपत्र, 7 व्यक्तींना रहिवासी प्रमाणपत्र देण्यात आले.  यावेळी भटक्या विमुक्तांतील गारुडी, कुडमुडे जोशी आदींनी आपल्या पारंपारिक पोषाखात मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे व मान्यवरांचे स्वागत केले.