आधार केंद्रांवरील दोषींवर बंदची कारवाई- जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद,११ जुलै /प्रतिनिधी :- भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने दिलेल्या निर्देशाचे पालन आधार नोंदणी ऑपरेटर, केंद्र चालक यांनी न केल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे. आर्थिक दंड ठोठावला, त्यामुळे त्यांचे आधार नोंदणी केंद्र का बंद करण्यात येऊ नये,  याबाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे आज सुनावणी झाली. या सुनावणीत महा-ई-सेवा केंद्र चालकांचा खुलासा समाधानकारक नसल्याने त्यांचे केंद्र रद्द करण्यात येत असल्याचा निर्णय जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला.

             आधार नोंदणी केंद्रांवर शासनाने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा जास्त शुल्क आकारल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लेखी तक्रार करावी,  असे आवाहन जिल्हाधिकारी चव्हाण यांनी नागरिकांना केले आहे. तसेच सादर केलेल्या तक्रारीची चौकशीमध्ये आधार केंद्र चालक दोषी आढळल्यास ते आधार नोंदणी केंद्र बंद करण्यात येईल. नवीन नोंदणीसाठी,  वयाचे ५ वर्षानंतरचे बायोमेट्रिकचे अपडेटसाठी शुल्क लागणार नाही. नाव, मोबाईल क्रमांक, पत्ता, वय दुरस्तीसाठी ५० रुपये लागणार आहेत. बायोमेट्रिक अपडेट 100 रूपये शुल्क द्यावे लागतात, असेही श्री. चव्हाण यांनी कळविले आहे.

           जिल्ह्यातील पांडुरंग श्रीरंग जगताप, शासकीय ग्रंथालय, कोहिनूर कॉलनी, औरंगाबाद ,  सतीश निवृत्ती सर्जे, जुने तहसील कार्यालय, पैठण,  बसवंत गणपती बरसमवार, प्रभाग कार्यालय ३, मनपा, सेन्ट्रल नाका औरंगाबाद, समीर खान मातीन खान, मनपा शाळा, राहुल नगर, औरंगाबाद यांच्या महा-ई-सेवाद्वारे सुरू असलेल्या आधार नोंदणी केंद्रांवरील ऑपरेटर OBD (outbound dialer) सर्व्हेमध्ये दोषी ठरल्याने त्यांना भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने निलंबित केले आहे.  दोषींवर ५० हजार ते १ लाख पर्यंत दंड ठोठावल्याचे आधार, महाआयटीच्या जिल्हा समन्वयकांनी सांगितले.