पंतप्रधानांनी औरंगाबादच्या पाणीप्रश्नात लक्ष घालावे- राज्यपाल

मुंबई ,१४ जून  /प्रतिनिधी :-  औरंगाबाद येथे अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावते आहे. इथला पाणी प्रश्न बिकट असून पंतप्रधानांच्या नेतृत्त्वात ही समस्या निकाली लागेल ‘मोदी है तो मुमकीन है’ असे म्हणत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पंतप्रधानांना पाणी प्रश्नाच्या सोडवणुकीची गळ घातली.

राजभवनातील क्रांतीगाथा गॅलरीचा आणि नव्या जलभूषण इमारतीचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ झाला. याप्रसंगी राज्यपाल बोलत होते. यावेळी राज्यापाल कोश्यारी यांनी सांगितले की, औरंगाबाद दौऱ्यावर असताना स्थानिक नागरिकांनी पाणी प्रश्नाबाबत त्यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले होते. आम्हाला पाच ते सात दिवस पाणी मिळत नाही, अशी तक्रार केली होती.

असे अनेक प्रकल्प आहे जे रखडले आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात हे प्रश्न निकाली लागतील. अरुण जेटली सर्वांत अगोदर म्हणाले होते ‘मोदी है तो मुमकीन है’. मी आठ वर्षांनी म्हणतो ‘मोदी है तो मुमकीन है’, असे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यावेळी म्हणाले. औरंगाबादच्या पाणी प्रश्नावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरू असतानाच राज्यपालांनी या प्रश्नाकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधले आहे.