औरंगाबाद विमानतळ विस्तारीकरणाबाबत केंद्रीय नागरी उड्डयन मंत्र्यांसोबत बैठक सकारात्मक 

केंद्रीय राज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नवी दिल्लीत घेतली भेट 

इमिग्रेशन आणि विमानतळ विस्तारीकरण संदर्भात सकारात्मक चर्चा 

औरंगाबाद ,१० मे /प्रतिनिधी :- केंद्रीय राज्य वित्त मंत्री डॉ. भागवत कराड यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद येथील शिष्टमंडळाने विमानतळ विस्तारीकरणासह विविध मुद्यांवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची नवी दिल्ली येथील राजीव गांधी भवन येथे भेट घेतली. यावेळी विमानतळ  विस्तारीकरण, रात्रीच्या वेळी विमानांचे पार्किंग, सकाळच्या सत्रात अतिरिक्त विमाने, उडान अंतर्गत येणाऱ्या शहरांशी हवाई मार्गाने जोडणे आणि इमिग्रेशन सुविधा या प्रमुख पाच मुद्यावर चर्चा झाली.

Image

यावेळी सीएमआयए चे अध्यक्ष शिवप्रसाद जाजू, उपाध्यक्ष नितीन गुप्ता, उत्सव माछर, दुष्यंत आठवले, अभिषेक मोदानी, औरंगाबाद फर्स्टचे माजी अध्यक्ष प्रीतीश चटर्जी, उपाध्यक्ष मुकुंद कुलकणी आणि विवेक देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विमानतळ विस्तारीकरणाबाबत मुकुंद कुलकर्णी यांनी पावर पोइंत प्रेझेन्टेशन केले. 

याबाबत शिष्टमंडळाने सांगितले, या शिष्ठमंडळात सीएमआयए ,मासिआ आणि औरंगाबाद फर्स्ट सदस्यांचा समावेश होता. यामध्ये प्रामुख्याने पाच मुद्यांवर चर्चा करण्यात आली. पहिला मुद्दा म्हणजे औरंगाबादमध्ये औद्योगिक वसाहत झपाट्याने विकसित होत आहे. त्यादृष्टीने पुढील २५ वर्षांचा विचार करून विस्तारीकरणाचा विचार करण्यात यावा. त्याचबरोबर कोरोना पूर्वी औरंगाबादमधून १७ विमाने उड्डाण घेत होती. आता ही संख्या अत्यल्प आहे. ही संख्या पुन्हा पूर्वपदावर आणून नव्या विमानसेवेसाठी प्रयत्न केले जावे. औरंगाबादमध्ये नाईट पार्किंगची सुविधा निर्माण करता येऊ शकते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत शहरात येण्यासाठी आणि सकाळी लवकर शहराबाहेर जाण्याची सोय होईल. कारण, आजघडीला औरंगाबादची विमानसेवा सायंकाळी चारनंतर आहे. त्याचबरोबर औरंगाबाद येथे इमिग्रेशन सुविधा सुरु करण्यात यावी. जेणेकरून आंतरराष्ट्रीय विमानसेवेला प्रोत्साहन मिळेल. या संदर्भात गृहमंत्रालयासाशी संवाद साधावा. याशिवाय एअर कार्गो सेवेचा सर्वोत्तम उपयोग करून घेण्याबाबत चर्चा झाली. 

Image

इमिग्रेशनला तत्वता मान्यता यावर उत्तर देताना केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले कि,  औरंगाबाद येथील विमानतळ विस्तारीकरणाचा मुद्दा महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू. त्याचबरोबर इमिग्रेशन सुविधा सुरु करता येऊ शकेल. यासाठी गृहमंत्रालय विभागाशी चर्चा करू. त्यासह इतर मागण्यांबाबत अभ्यास करून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला जाईल. 

फ्लाय बिग कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संजय मांडविया यांच्याशी औरंगाबाद ते हैदराबाद या विमानसेवेशिवाय इतर शहरांमध्ये विमानसेवा सुरु करण्याबाबत चर्चा झाली. त्याशिवाय भारतातील उडान शहरांशी औरंगाबादला विमान सेवेशी जोडण्यासाठी औरंगाबादच्या संस्था व संघटनांनी पुढाकार घ्यावा. ज्यामुळे विमानसेवा बळकट होईल, असे विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या चर्चेतून निष्पन्न झाले.  

यावेळी इमिग्रेशनचे सहसचिव (गृहमंत्रालय) सुमंत सिंग, औषध नियंत्रक प्रमुख व्ही.जी. सोमाणी, विमानतळ प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार भारद्वाज, कार्यकारी संचालक (ऑपरेशन) विवेकानंद चौरे, फ्लाय बिगचे व्यवस्थापकीय संचालक संजय मांडविया, औरंगाबाद फर्स्टचे उपाध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, सीएमआयएचे अध्यक्ष शिवप्रसाद जाजू, उद्योजक विवेक देशपांडे, प्रीतीश चटर्जी, नितीन गुप्ता, उत्सव माछर, अभिषेक मोदवाणी, दुष्यंत आठवले, संजय केणेकर, भगवान घडामोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.