वैजापूर तालुक्यातील 47 हजार 92 शेतकऱ्यांचे अनुदानाची रक्कम 11 कोटी 12 लाख रुपये बँक खात्यावर जमा
वैजापूर,२२ मार्च /प्रतिनिधी :-गेल्या वर्षी ऑगस्ट -सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीपोटी राज्य सरकारने यापूर्वी 75 टक्के रक्कम शेतकऱ्यांना वाटप केली होती उर्वरित 25 टक्के रकमेच्या प्रतीक्षेत असलेल्या तालुक्यातील 66 गावांतील 47 हजार 92 शेतकऱ्यांसाठी दुसऱ्या टप्प्यात 11 कोटी 12 लाख 05 हजार 125 रुपयांचा निधी प्राप्त झाला असून तो वाटपासाठी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला आहे.
अतिवृष्टी व पुरामुळे तालुक्यातील 1 लाख 04 हजार 816 हेक्टर क्षेत्रावरील खरीप पीक बाधित होऊन 1 लाख 30 हजार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. राज्य सरकारने दोन हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार पहिल्या टप्प्यात तालुक्यातील 1 लाख 18 हजार 552 शेतकऱ्यांना सुमारे 83 कोटी 22 लाख 45 हजार रुपयांची मदत दिवाळीपूर्वीच मिळाली होती. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित 25 टक्के रक्कम वाटपासाठी राज्यसरकारने मंजुरी दिली असून शासनाकडून मदत अनुदान प्राप्त झाले आहे.
तलाठ्यांकडून प्राप्त झालेल्या याद्यांनूसार तालुक्यातील 66 गावांतील 47 हजार 092 शेतकऱ्याचे 44 हजार 872 आर.9 हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी 11 कोटी 12 लाख 05 हजार 125 रुपयांचा मदत निधी प्राप्त झाला असून शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी मध्यवर्ती बँकेच्या शाखांमध्ये जमा करण्यात आला आहे. येत्या दोन – तीन दिवसांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे. अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.