प्लाझ्मा थेरपीसाठी पाठपुरावा सुरु- जिल्हाधिकारी उदय चौधरी

औरंगाबाद (जिमाका) दि. 13 :- कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लॉकडाऊन कालावधीचा उपयोग करुण यंत्रणांमार्फत मोठया प्रमाणात सर्वेक्षण व ॲण्टीजन चाचण्या करण्यात येत आहेत .त्याचप्रमाणे घाटीत प्लाझ्मा थेरपी लवकरात लवकर सुरु होण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेली परवानगी मिळण्यासाठी एनआयव्हीकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज येथे सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधीसोबत कोरोना उपाययोजनांबाबतच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी खा. भागवत कराड, खा. इम्तियाज जलील, आमदार सर्वश्री. हरिभाऊ बागडे, प्रदीप जैस्वाल, सतीश चव्हाण, अतुल सावे, अंबादास दानवे यांच्यासह मनपा आयुक्त आस्तिक पांडेय, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, अपर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, यांच्यासह इतर संबंधित उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. चौधरी यांनी लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी करत कोरोना रुग्णांचा शोध घेऊन रुग्णांचे वेळेत निदान करण्यावर भर देण्यात येत असल्याचे सांगितले, यादृष्टीने ॲण्टीजेन टेस्ट सर्वेक्षण उपयुक्त ठरत आहे. तसेच रुग्णांना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यावर प्रशासन कटाक्षाने लक्ष देत असून कोरोनासाठी उपयुक्त असलेल्या इंजेक्शन्सची उपलब्धता पुरेशा प्रमाणात होण्याच्या दृष्टीने आरोग्य मंत्र्यांकडे त्यासोबतच इंजेक्शन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या वितरकांसोबत सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र सद्यस्थितीत सर्वत्र इंजेक्शन्सची मागणी जास्त असून त्या तुलनेत उत्पादन फक्त एकच कंपनी करत असल्याने त्याच्या उपलब्धतेचा तुटवडा जाणवत आहे. मात्र सातत्याने ही औषधे उपलब्ध करुन घेण्याच्या दृष्टीने भरीव प्रयत्न यंत्रणेव्दारे केल्या जात आहे. त्यासोबतच उपचारात उपयुक्त असलेली प्लाझ्मा थेरेपी घाटीत सुरु करण्यासाठीची तांत्रिक सर्व बाबींची पूर्तता झाली आहे. मात्र त्यासाठी सॅम्पल प्रमाणीकरण चाचणी एनआयव्हीमधून होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने त्यांच्याकडे पाठपुरावा सुरु असून लवकरच या उपचार पध्दतीला परवानगी मिळेल. त्यासाठी कोरोनामुक्त झालेल्यांनी प्लाझ्मा देण्यासाठी पुढे यावे. जेणेकरुन प्लाझ्मा बँक तयार ठेवता येईल , असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

खा. श्री. कराड यांनी ॲन्टीजेन टेस्ट आणि सर्वेक्षणातून बाधित रुग्णांपर्यत पोहचण्याची यंत्रणेची कार्यपध्दती उत्तम असल्याचे सांगून संचारबंदीनंतर सर्वेक्षण अधिक व्यापक करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींचे सहकार्य घेण्याची सूचना केली. खा. श्री जलील यांनी लॉकडाऊन कालावधी हा चाचण्या आणि सर्वेक्षण व्यापक प्रमाणात करण्यासाठी उपयुक्त आहे. त्यादृष्टीने प्रमाण वाढवावे, तसेच रुग्णांसाठी आवश्यक असलेले इंजेक्शन्स हे डॉक्टर्सनी प्रामुख्याने खाजगी रुग्णालयांनी आपल्या स्तरावर इतर रुग्णालयांशी संपर्क साधून उपलब्ध करुन घ्यावेत, असे सूचित केले.

आ. श्री. जैस्वाल यांनी सीसीसी सेंटर, कोवीड रुग्णालयांनी रुग्णांना सर्व सोयी सुविधा उत्तमरित्या उपलब्ध करुन देण्याची खबरदारी बाळगण्याच्या सूचना केल्या. आ. दानवे यांनी ॲण्टीजेन टेस्टमध्ये प्राधान्याने पन्नाशीपुढील नागरिकांची तपासणी करण्यावर भर देण्याचे सूचित केले.

आ. चव्हाण यांनी कोरोनावर गुणकारी ठरणारे इंजेक्शन्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन घेण्याची गरज असून प्लाझ्मा थेरपी तातडीने घाटीत सुरु होणे रुग्णांच्या दृष्टीने गरजेचे असल्याचे सांगितले. आ. श्री सावे यांनी लॉकडाऊनमध्ये पुंडलिकनगर सह ज्या परिसरात पिण्याचे पाण्याची समस्या आहे. त्या ठिकाणी टँकरव्दारे पाणी पुरवठा वाढवावा, अशी सूचना केली . यावेळी मनपा आयुक्त श्री. पांडेय यांनी ॲण्टीजेन टेस्टव्दारे रुग्णांचे वेळेत निदान होत असून याद्वारे संसर्गाचा प्रसार रोखण्यात सहाय्य मिळेल. शहरातील विविध ठिकाणी या चाचण्या करण्यात येत असून शहरात प्रवेश करणाऱ्या नागरिकांच्या तपासणीसाठी चेक नाक्यांवर 24 तास पथक कार्यरत असून यामध्ये एक डॉक्टर, एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ , डेटा ऑपरेटर यांचा समावेश आहे. तसेच नऊ पथकाव्दारे ज्या ठिकाणी रुग्ण आढळून आला त्या परिसरात कॉनटॅक्ट मॉपिंगद्वारे 500 मीटर परिसरातील लोकांची ॲण्टीजेन टेस्ट करण्यात येत आहे. यामध्ये बाधित रुग्णांना सीसीसीमध्ये पाठवले जात असून ज्यांचा अहवाल निगेटीव्ह आला त्यांचा आरटीपीसीआरसाठी स्वॅब घेण्यात येतो. त्याचा अहवाल येईपर्यंत संबंधितांना 15 तास होम क्वारंटाइन ठेवल्या जात आहे. त्यासोबतच सहा चेक नाक्यावर तपासणी सुरू असून या व्यतिरीक्त येथे वाळूज भागातून येणाऱ्या सर्व कामगारांचीही ए.एस.क्लब जवळ चाचणी करण्यात येत असल्याचे श्री. पांडेय यावेळी सांगितले. तसेच पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी लॉकडाऊनबाबत माहिती दिली. यावेळी लोकप्रतिनिधींनी प्रशासनाद्वारे लॉकडॉऊन अंमलबजावणीबाबत तसेच या कालावधीत विविध ठिकाणी तसेच शहराच्या प्रवेश नाक्यांवरही ॲण्टीजेन टेस्ट करुन बाधित रुग्णांना लगेच उपचार देण्यात येत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *