अलौकिक सूर हरपले – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख

मुंबई,६ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  “आपल्या अलौकिक सूरांनी संपूर्ण विश्वाला मंत्रमुग्ध करणाऱ्या भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्र मूक झाले आहे”, अशा शब्दांत सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी शोक व्यक्त केला आहे.

“लता दिदींनी आपल्या अतुलनीय सूरांनी भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींच्या अनेक पिढ्यांना पडद्यावर आवाज देऊन त्यांचे व्यक्तिमत्व खुलविले. प्रत्येक भारतीयाच्या मनातील विविध भावभावना त्यांनी आपल्या गायनातून चपखलपणे व्यक्त केल्या. प्रदीर्घ काळ पार्श्वगायन क्षेत्रावर त्यांची मोहिनी होती आणि पुढेही राहील. देशाप्रती अत्यंत अभिमान असलेल्या लतादिदी संपूर्ण विश्वात भारताचा अभिमान म्हणून आदरास प्राप्त झाल्या. त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्राची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे.

लतादिदींशी देशमुख कुटुंबीयांचे निकटचे संबंध होते त्यांच्या जाण्याने मंगेशकर कुटुंबीयांना झालेल्या दुःखात देशमुख कुटुंबीय सहभागी आहेत “, असेही अमित देशमुख यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.