कोरोनाविरुद्धच्या लढाईत मुलांनाही मिळाले लसीचे सुरक्षा कवच
15 ते 18 वयोगटातील लसीकरणाचा वाळूज प्राथमिक आरोग्य केंद्रातून शुभारंभ
लसीकरणामुळे प्रतिकारशक्तीत वाढ होत असल्याने कोरोना संक्रमणाला अटकाव होणार–जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
औरंगाबाद लसीकरणामुळे प्रतिकारशक्तीत वाढ होत असल्याने कोरोना संक्रमणाला अटकाव होणार आहे. 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींची प्रतिकारशक्ती या लसीकरण मोहिमेने प्रबळ होणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या संक्रमणाला रोखण्यासाठी लसीकरण करणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर आज औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पंधरा ते अठरा वयोगटातील मुलां-मुलींना लसीकरण देण्यास प्रारंभ झाला. लसीकरण मोहिमेचा शुभारंभ वाळूज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याहस्ते झाला. 15 ते 18 वयोगटातील औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना ची पहिली लस ज्योती खैरनार या विद्यार्थिनीला वाळूज प्राथमिक आरोग्य केंद्रात देण्यात आली. यावेळी आमदार प्रशांत बंब, जिल्हा परिषद अध्यक्ष मीनाताई शेळके, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, वाळूजच्या सरपंच सईदा नबी पठाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके, पंचायत समिती सदस्य दीपक बडे, ज्योती गायकवाड यांच्यासह वाळूज प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक यांच्साह आशासेविका यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, लसीकरण मोहिमेमध्ये जिल्ह्याने चांगले काम केले आहे. 15 ते 18 वयोगटातील सर्व मुलांचे लसीकरण लवकरात लवकर व्हावे यासाठी आरोग्य यंत्रणांनी सुक्ष्म नियोजन करुन जिल्हा लसवंत करावा, असेही ते म्हणाले.
आमदार बंब यावेळी म्हणाले की, ओमायक्रॉनला अटकाव करण्यासाठी सर्व पात्र लाभार्थ्यांनी लसीकरण करुन घेणे गरजेचे आहे. लसीकरणाला पर्याय नाही. लसीकरण करुन जिल्हा कोरोनामुक्त करुया, असेही ते म्हणाले.
एसबीओए शाळेत चांगला प्रतिसाद
औरंगाबाद शहरातील एसबीओए शाळेत या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला. १५ ते १८ या वयोगटांतील ५१६ विद्यार्थ्यांनी लसीकरण करून घेतले. एसबीओए शाळेतील काही मुलामुलींच्या या प्रतिक्रिया.
मी सुरक्षित—मिहिका मनोज जिंतुरकर
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी आम्हाला पंधरा ते अठरा वर्षाच्या मुलांसाठी लसीकरण आजपासून सुरू केले आहे. ही आमच्यासाठी एक सुवर्णसंधी होती. लसीकरण शाळेत झाल्यामुळे कसलीही चिंता नव्हती .आमची पूर्ण काळजी घेतली गेली . आधी थोडी भीती वाटत होती पण आता मी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे आणि मी सुरक्षित आहे असा विश्वास वाटतो आहे
सुरळीत जीवन शैली मिळाल्याची आशा– वेदश्री पुंड
लसीकरणाने दिले नवीन जीवन– जणू असेच वाटत होते .बदललेल्या जीवनशैलीतून आलेली निराशा आता दूर झाली. परत सुरळीत जीवन शैली मिळाल्याची आशा देऊन गेली ही लस. शिक्षणात आलेले अडथळे ऑनलाईन मुळे जरी दूर केले पण खऱ्याखुऱ्या शाळेत येण्याची इच्छा – अपेक्षा आता नेहमी पूर्ण होईल -असा विश्वास लसीने मिळवून दिला.
सर्वांनी लसीकरण करून घ्यावे-वरद गाडेकर
सर्वांनी लसीकरण करून घ्यावे, कारण हे आपल्या फायद्याचेच आहे . लस घेतल्याने आम्ही कोरोनाशी लढण्यास तयार झालो . लस घेतल्यावर आपल्याला काहीच त्रास होत नाही, याउलट आपण कोरोनाशी लढा द्यायला आपण तयार होतो हा विश्वास वाढला.
शाळेने उत्तम व्यवस्था ठेवल्यामुळे भीती कमी-ओंकार देशपांडे
लस घेण्यापूर्वी आधी खूप भीती वाटत होती ,पण शाळेने उत्तम व्यवस्था ठेवल्यामुळे भीती कमी झाली.लस आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे कारण आमची बोर्डाची परीक्षा ऑफलाईन असणार आहे .आता बोर्डाच्या परीक्षेसाठी आम्ही लस घेतल्यामुळे सुरक्षित आहोत- ही भावना मनात तयार झाली आहे.
परीक्षा चिंतामुक्त होऊन देऊ शकतो- जान्हवी निकम
आज आमच्या शाळेत कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. मी आणि माझ्या वर्ग मित्रांनी लसी बद्दल जागरूकता दाखवली लस घेण्यासाठी आम्ही तयार झालो.लस घेण्याआधी मनात थोडी भीती होती पण शाळेत आलेल्या मेडिकल ऑफिसरने सर्व शंकाचे निरसन केले.शाळेने केलेली व्यवस्था इतकी उत्तम होती की सगळ्या शंका आणि भीती दूर झाली. लस घेतल्यानंतर कोरोनापासून आता आपण सुरक्षित आहोत असे वाटले मुख्य म्हणजे मी आणि माझे वर्गमित्र आता दहावी बोर्डाची परीक्षा चिंतामुक्त होऊन देऊ शकतो. शाळेने आमच्या सुरक्षिततेसाठी ही मोहीम राबवली यासाठी मी शाळेची आभारी आहे.