पिडितेला न्याय मिळण्यासाठी बारकाईने चार्जशीट तयार करा -पालकमंत्री राजेश टोपे यांचे निर्देश

मंठा येथे झालेल्या खुन प्रकरणात दिरंगाई होणार नाही याची दक्षता घ्या,प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी गृहमंत्र्यांशी चर्चा

जालना, दि. 4 –नुकतच आपलं वैवाहिक जीवन सुरू करू पाहत असणाऱ्या युवतीचा चार दिवसांपूर्वी मंठा येथे खून झाला. मंठा येथील घटना ही अत्यंत दुर्देवी, वेदना देणारी, मन हेलावून टाकणारी व माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना असुन या प्रकरणामध्ये आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळून पिडीतेला न्याय मिळवुन देण्यासाठी बारकाईने व वेळेत चार्जशीट दाखल करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी पोलीस प्रशासनाला निर्देश दिले आहे.

चार दिवसाखाली जालना जिल्ह्यातील मंठा येथील नवविवाहित वैष्णवी गोरे या युवतीचा खुन झाला होता. ही बातमी समजताच यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांना या प्रकरणात लक्ष घालुन तातडीने कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार मारेकऱ्यास अटक करत आरोपीकडून वापरण्यात आलेले शस्त्रसुद्धा जप्त करण्यात आले आहे. न्यायवैद्यक अहवालातुन आवश्यक ते पुरावे शोधण्यात आले आहेत. या प्रकरणाची चार्जशीट वेळेत व बारकाईने करुन प्रकरण न्यायालयात तातडीने दाखल करण्यासाठी पोलीस निरीक्षकांकडे असलेले हे प्रकरण काढून ते उप विभागीय पोलीस अधिकारी, परतुर यांच्याकडे देण्यात आले आहे. या प्रकरणामध्ये कुठलीही उणिव अथवा दिरंगाई होणार नाही, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चा करुन हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालविण्याबाबत विनंती करण्यात आली असुन या प्रकरणातील पिडीतेचे वकीलपत्र निष्णात विधिज्ञ उज्वल निकम यांच्याकडे देण्यासाठीही आपण विनंती केली असुन त्यांनी ती मान्यही केली आहे. तसेच याबाबत घोषणाही करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री श्री टोपे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *