एकजुटीने, एकदिलाने कोरोनाच्या युद्धात जिंकूया : उदय चौधरी

औरंगाबाद, दिनांक 30 : औरंगाबादकरांनी स्वयंशिस्तीचे पालन करत एकजुटीने, एकदिलाने कोरोना युद्धात जिंकायचेच आहे, त्यासाठी सर्वांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज औरंगाबादकरांना केले. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून श्री. चौधरी यांनी आज औरंगाबादकरांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. औरंगाबादकरांचाही मोठ्याप्रमाणात या लाईव्हप्रसंगी प्रतिसाद मिळाला.

संवादाच्या सुरूवातीस श्री. चौधरी यांनी औरंगाबादेतील कोविड योद्धे प्रयत्नांची पराकाष्टा करत या युद्धात रात्रंदिवस काम करत आहेत. या यंत्रणांचे मनोबल उंचावणे आपणा सर्वांसाठीच महत्त्वाचे आहे. प्रशासनातील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी पूर्ण क्षमतेने कार्य करत आहे. परंतु काम करताना होणाऱ्या चुका प्रशासनाच्या लक्षात आणून देण्याचे कार्यही नागरिकांनी करून द्यावे, त्याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. नागरिकांनी प्रशासनासोबत येऊन प्रशासनास सहकार्य करावे. चुका असतील त्या कळवाव्यात, नागरिकांच्या सूचनांचे तत्काळ दखल घेऊन कार्यवाही करण्यात येईल, असे श्री. चौधरी म्हणाले. लॉकडाऊन, कर्फ्यूने परिस्थिती नियंत्रणात येईलही, परंतु नागरिकांनीही मास्कचा वापर, वारंवार हात साबणाने धुणे, शारीरिक अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा वापर करावा. तसेच स्वयंशिस्तीने सामाजिक जीवनात आपली जबाबदारी ओळखून समाजातही जनजागृती करावी, असे आवाहनही श्री. चौधरी यांनी केले.

औरंगाबाद कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. परंतु प्रशासन पूर्ण क्षमतेने या रुग्णांच्या सोयी सुविधा, उपचार याबाबत पूर्णत: यशस्वी झालेले आहे. आता मिशन बिगिनच्या दुसऱ्या टप्प्यात ग्रामीण भागात परिस्थिती जैसे थेच आहे. परंतु त्यात भर म्हणजे शैक्षणिक संस्थांमधील प्रशासकीय अधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी कर्तव्यावर रुजू होऊ शकतात मात्र शिकविण्यास परवानगी नाही. औरंगाबाद मनपाच्या हद्दीतही असे कर्मचारी शैक्षणिक संस्थांत येऊ शकतात. तर सरकारी कार्यालये 15 टक्के आणि खासगी कार्यालये 10 टक्के क्षमतेने चालू करण्यात सूट देण्यात आलेली आहे. ग्रामीण भागात बसेस सुरु राहतील, मोठ्या बाजारपेठा, मॉल्स, जलतरण तलाव बंद राहतील.

मृत्यू दर कमी करण्यावर भर

औरंगाबाद शहरातील कोरोना प्रसाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या अनुभवावरून औरंगाबादच्या लगत असलेल्या वाळूज औद्योगिक परिसरात वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रसारावर आळा घालण्यासाठी प्रशासनाने पूर्णत: कंबर कसलेली आहे. औरंगाबादवर यापूर्वीचा मृत्यू दर यापूर्वी 5.81 टक्के होता, आता हाच दर 4.71 टक्क्यांवर आलेला आहे. मृत्यू दर आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने सर्वोतोपरी पद्धतीने प्रयत्न सुरूच ठेवलेले आहेत. तसेच वाळुज-बजाजनगर परिसरात ४ ते १२ जुलैदरम्यान जनता कर्फ़्यु राहणार असल्याचेही श्री. चौधरी म्हणाले. संक्रमित व संशयित लोक लवकर शोधल्याने वाळूज महानगरातील मृत्युदर नियंत्रणात आणला आहे. बजाजनगर येथे आज केवळ ०.५ टक्के मृत्युदर आहे. मात्र शहराची परिस्थिती तुलनेने वेगळी आहे. तरीही शहरात नियम न पाळल्यास १० दिवसांनी येथेही कर्फ्यू लागु करण्याकडे प्रशासनविचार करत असल्याचे चौधरी म्हणाले.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवा

जो व्यक्ती सुदृढ आहे तो कधीही आजारी पडत नाही.त्यामुळे कोरोनापासून बचावासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे अहे.शासनाने तसेच आयुष मंत्रालयाने सांगितलेला आयुर्वेदिक काढा, अर्सेनिक अल्बम ३०च्या गोळ्या, योग्य आहार, व्यायाम, झोप यांचा अवलंब जीवनशैलीत करावा, असेही श्री. चौधरी म्हणाले. ऑनलाईन शिकवणीला परवानगी, स्वयंशिस्त पाळा

खासगी कोचिंग क्लासेसला परवानगी नाहीच, तर ऑनलाईनला शिक्षणाला परवानगी दिलेली आहे. विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाया केल्या आहेत, गुन्हेही दाखल केले आहेत. पण अशी परिस्थिती उद्भवु नये म्हणून प्रत्येकाने स्वयंशिस्त लाऊन घेणे महत्वाचे आहे, असेही श्री. चौधरी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *