औरंगाबाद जिल्ह्यात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले- पालकमंत्री सुभाष देसाई
औरंगाबाद , दि. 25 :- जिल्ह्यात कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण हे वाढत्या संसर्गातही चांगले आहे. याच पद्धतीने संसर्गाला रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी पूर्ण तयारीनिशी सज्ज राहण्याचे निर्देश राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठक पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली, यावेळी त्यांनी संबंधितांना निर्देश दिले. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदावले, घाटी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुदंर कुलकर्णी, मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, जिल्हा उपनिबंधक अनिल दाबशेडे, जिल्हा कृषी अधीक्षक तुकाराम मोटे, कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असून आनलॉक नंतर सध्या संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. ते रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील असून आरोग्य यंत्रणांनी सुद्धा पूरेसा औषधसाठा, मनुष्यबळ, उपकरणे यासह सज्ज होऊन काम करावे. कोरोनाच्या लढाईत प्रत्येकाची भूमिका महत्वाची आहे, असे सांगूण पालकमंत्री यांनी ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तसेच वाढता संसर्ग लक्षात घेऊन पूरेशा प्रमाणात खाटांची, ऑक्सीजनची, डॉक्टरर्स व इतर पूरक गोष्टींची तयारी ठेवण्याबाबत संबंधितांना निर्देश दिले.
तसेच आरोग्य सुविधा भक्कम करण्यास शासन प्राधान्य देत असून महिना भरात आपण जिल्ह्यात मेल्ट्रॉन येथे डेडीकेटेड कोविड रूग्णालय सुरू केले आहे. यामूळे वाढीव आरोग्य सुविधा उपलब्ध झाली. त्यासोबतच खाजगी डॉक्टर्सनी सुद्धा या लढाईत सहभागी होत यंत्रणेला सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले. कोविड रूग्णांसाठी विशेष उपचार प्रक्रिया राबवत असतानाच पाससाळ्यामधील साथरोगावर देखील नियंत्रण ठेवण्याचे काम आरोग्य यंत्रणांनी करावे. सर्व रूग्णांना तातडीने योग्य ते उपचार देण्यावर कटाक्षाने भर द्यावा. घाटीमध्ये आवश्यक इंजेक्शनचा पूरेसा साठा उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करू असे श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.राज्यमंत्री श्री. सत्तार यांनी ग्रामीण भागात आरोग्य सुविधा तसेच शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज वाटप करण्यासाठी विशेष लक्ष द्यावे. कापूस मका खरेदी प्रक्रिया विनाअडथळा पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना संबंधितांना दिल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोंदवले यांनी 15 जून पासून ग्रामीण भागातील संसर्ग वाढलेा असून यामध्ये प्रामुख्याने शहरालगतच्या उपनगरीतील तालुक्यांमध्ये कोरोना बाधितांचे प्रमाण जास्त असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील 467 रूग्णांपैकी औरंगाबाद तालुक्यात सर्वात जास्त 378 रूग्ण आढळलेले असून बजाजनगर या उद्योग परिसरात लॉकडाऊन उठल्यानंतर कंपन्या सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे कामगारांची ये-जा, वर्दळ वाढलेली आहे. हॉटस्पॉट बनलेल्या या बजाजनगरमध्ये तसेच ग्रामीण भागातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी महसूल यंत्रणा आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त प्रयत्नातून 60 टीम कार्यरत आहे. जनजागृती, संपर्कातील व्यक्तींचा शोध, पन्नास पूढील नागरिकांची आरोग्य तपासणी, यासह विविध नियंत्रणात्मक उपाययोजना भरीव प्रमाणात ग्रामीण भागात राबवण्यात येत असल्याची माहिती श्री. गोंदवले यांनी यावेळी दिली.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कुलकर्णी यांनी जिल्हा रूग्णालयात आज 147 रूग्ण दाखल असून आतापर्यंत 863 रूग्णांवर येथे उपचार करण्यात आले असल्याचे सांगितले.घाटीच्या अधिष्ठाता डॉ. येळीकर यांनी घाटीमधील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कोवीड रूग्णांसाठी सुरू करण्यात आले असल्याने घाटीमध्ये एकूण 456 खाटा ऑक्सीजनसह कार्यान्वीत असल्याचे सांगितले. तसेच आयसीयु खाटा 90 असून 85 व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. घाटीतील 30-35 रूग्ण आतापर्यंत बरे झाले असून रूग्ण बरे होण्याचे प्रमाण येथील गंभीर परिस्थितीत रूग्ण दाखल होण्याच्या तुलनेत चांगले आहे. गंभीर रूग्णांसाठी वापरण्यात येणारे इंजेक्शन उपयुक्त ठरत असून त्याचा साठा वाढवणे गरजेचे असल्याचेही डॉ. येळीकर यांनी यावेळी सांगितले.
मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. पाडळकर यांनी चिकलठाणा मेल्ट्रॉन येथे नवीन कोवीड रूग्णालय 22 जूनपासून सूर करण्यात आले असून आजघडीला त्याठिकाणी 72 रूग्ण दाखल असल्याचे सांगितले. संसर्ग रोखण्यासाठी 100 टक्के संस्थात्मक क्वॉरंटाइन करण्यावर भर दिला जात असून दिवसाला 400 त 450 लाळेचे नमुने तपासणी करण्यात येत आहेत. वाढता संसर्ग लक्षात घेऊन पूरेशा प्रमाणात खाटांची व्यवस्था ठेवण्यात आली असून मेल्ट्रॉन येथील कोविड सेंटरमध्ये सर्व सुविधा उपलब्ध केल्या आहेत, अशी माहिती डॉ. पाडळकर यांनी यावेळी दिली.
जिल्हाधिकारी श्री. चौधरी यांनी ग्रामीण भागातील संसर्ग रोखण्यासाठी तातडीने बजाज कंपनीसोबत बैठक घेऊन आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. टप्याटप्याने पाच दिवसाचा शटडाऊन कंपनीत करण्यात येत असून बजाजनगर भागातील संसर्ग रोखण्यासाठी उपयोग होईल. तसेच जिल्हा परिषदेचे विभाग प्रमुख, आशावर्कर, तालुका आरोग्य अधिकारी आणि महसूल यंत्रणेचे उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, तलाठी व इतरांच्या विविध टिम तयार केल्या आहेत. तसेच तालुक्यातील डॉक्टर्स त्यांच्याकडे येणाऱ्या रूग्णांमध्ये संशयित वाटलेल्यांबद्दल तातडीने यंत्रणेला सूचना देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामूळे वेळेत त्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठवणे, विलगीकरण शक्य होत आहे. सर्व यंत्रणा एकमेकांच्या समन्वयातून काम करत असून निश्चितपणे येणाऱ्या काळातील धोका रोखण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. बांधावर खत, बियाणे वाटप, तसेच खरीप पीक कर्ज वाटपात जिल्हा उत्तम कामगिरी करत असून पीक कर्ज वाटपाचे दद्दिष्ट वेळेत पूर्ण केल्या जाईल, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
पोलीस आयुक्त श्री. प्रसाद यांनी गेल्या दोन अडीच महिन्यांपासून लढत असलेल्या सर्व कोरोना यांद्यांसाठी विशेष आरोग्य सुविधा, स्वतंत्ररित्या उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे सांगितले.
जिल्ह्यात पाऊस समाधानकारक होत आहे. शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पेरण्या व कृषी विषयक सुविधा खत, बियाणे पुरवठा, या बाबींचा आढावा घेऊन पालकमंत्र्यांनी संबंधितांनी वेळेत गुणवत्तापूर्ण सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्याव्यात. मका, कापूस खरेदी प्रक्रिया वेळेत पूर्ण करून घ्यावी. पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण कराताना शेतकऱ्यांना सुलभतेने वेळेवर कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी केल्या.