हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतीच्या बांधावर जाऊन केली नुकसानग्रस्त शेतीची पाहणी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून दिला धीर

हिंगोली,१ डिसेंबर / प्रतिनिधी :- राज्याचे अल्पसंख्यांक विकास व औकाफ, पणन मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या पिकाची शेतीच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले.

आज पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी औंढा नागनाथ तालुक्यातील हिवरा जाटु येथील रुस्तुमराव शिंदे यांच्या शेतावर जाऊन  अवकाळी  पावसामुळे नुकसान झालेल्या कापूस या पिकाची पाहणी केली. हिंगोली तालुक्यातील भिरडा येथील धोडींबा श्रावण खंदारे यांच्या कापूस व साहेबराव श्रावण खंदारे यांच्या तूर पिकाची तसेच कानरखेडा बु. येथील विठ्ठल रामजी भालेराव यांच्या कापूस पिकांची पाहणी केली.

या पीक पाहणीवेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासोबत खासदार हेमंत पाटील, आमदार तानाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे यांच्यासह हिवरा जाटू येथे तहसीलदार विठ्ठल परळीकर, तालुका कृषी अधिकारी गजानन पवार, तालुका कृषि अधिकारी सांगळे यांच्यासह  संबंधित गावातील सरपंच, विविध गावातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गोजेगाव येथील मयत शेतकरी राजू जायभाये यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन

तातडीची मदत म्हणून दिला चार लाख रुपयाचा धनादेश

औंढा नागनाथ तालुक्यातील गोजेगाव येथे रविवारच्या मध्यरात्री वीज अंगावर पडून तरुण शेतकरी राजू जायभाये  यांच्या घरी जाऊन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांची पत्नी दुर्गा राजेंद्र जायभाये यांच्याकडे नैसर्गिक आपत्ती सानुग्रह अनुदानाचा चार लाखाचा धनादेश दिला व शासन आपल्या कुटुंबियाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून आपल्या कुटुंबाला शासनाच्या ज्या ज्या योजनाचा लाभ मिळवून देता येईल त्या त्या योजनाचा लाभ मिळवून देण्यात येईल, असे सांगून मदत मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सूचित केले. तसेच मयत राजू जायभाये यांची पत्नी दुर्गा जायभाये, आई सुशीला जायभाये, अपंग भाऊ जालिंधर जायभाये यांच्याशी संवाद साधून त्यांना धीर दिला.

यावेळी खासदार हेमंत पाटील, आमदार तानाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ, तहसीलदार विठ्ठल परळीकर, तालुका कृषी अधिकारी गजानन पवार, गोजेगाव सरपंच वर्षा अच्चुतराव नागरे, हिवरा जाटू या गावचे संरपंच लखन शिंदे यांच्यासह  शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.