औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा – खासदार इम्तियाज जलील

नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा करुन मुख्यमंत्री यांच्याकडे केली मागणी

औरंगाबाद,२८ सप्टेंबर /प्रतिनिधी :- खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होवुन नुकसानग्रस्त शेतकरी बांधव व ग्रामस्थांना शासनस्तरावरुन आर्थिक मदत मिळाली का ? याची शहानिशा करण्यासाठी दिनांक २३ ते २७ सप्टेंबर दरम्यान नुकसानग्रस्त भागाची स्थळपाहणी करुन गंगापूर, वैजापूर, कन्नड व खुलताबाद तालुक्यातील सर्व विभागाची आढावा बैठक घेतली. शेतकरी बांधवांचे व ग्रामस्थांचे कधी न भरुन निघणारे आर्थिक नुकसान झाल्याने खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी बांधवांना आर्थिक मदत करण्याची मागणी केली.       

 

खासदार इम्तियाज जलील यांनी दिलेल्या पत्रात नमुद केले की, औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांना महापुर आल्याने शेतकरी बांधवांचे व ग्रामस्थांचे आतोनात आर्थिक नुकसान झाले असुन महाविकास आघाडी सरकारचे मंत्री, आमदार व सत्ताधारी पक्षाचे वरिष्ठ नेतेमंडळी यांनी पाहणी दौरा करुन नेहमीप्रमाणे फोटोसेशन केले आणि जिल्हाप्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करुन आठ ते दहा दिवसात शासनाच्या वतीने नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले होते. शेतकरी बांधव व ग्रामस्थांना शासनस्तरावरुन आर्थिक मदत मिळाली का ? याची शहानिशा करण्यासाठी जिल्ह्याचा खासदार या नात्याने इम्तियाज जलील यांनी नुकसानग्रस्त भागाला प्रत्यक्ष भेटी देवुन स्थळपाहणी केली. नुकसानग्रस्त भागातील शेतकरी बांधव व ग्रामस्थांनी त्यांच्या वेदनादायी व्यथा खासदार इम्तियाज जलील यांच्यासमोर मांडल्याचे नमुद केले.         

 

औरंगाबाद जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागातील स्थळ पाहणीत शेतकरी बांधवांचे उभे पिक वाहुन गेल्याचे  आणि शेतात गुडघ्या पर्यंत पाणी साचुन जमीनीवर मोठमोठे खड्डे पडल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत असुन त्याच शेतजमीनीवर शेती करणे शक्य होणार नसल्याचे शेतकरी बांधवांनी खासदार इम्तियाज जलील यांना सांगितले.             

नैसर्गिक आपत्तीमुळे हाती आलेले पिक वाया गेले आहे. मूग, उडीद, मका, तुर, ऊस, भुईमुग पाण्याखाली गेले असुन कपाशी व सोयाबीनसह अन्य पिकांची यापेक्षा वेगळी स्थिती नाही. त्यामुळे शेतकरी बांधव आर्थिक अडचणीत सापडले असुन कधी न भरुन निघणारे आर्थिक नुकसान झाले असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात नमुद केले आहे.