ग्रामपंचायत निवडणूक :दोन महिलांचे उमेदवारी अर्ज वैध,तृतीयपंथीयास दिलासा
औरंगाबाद, दि. 03 :ग्रामपंचायत निवडणुकीदरमयान निर्वाचन अधिकार्यांनी याचिकाकर्त्यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरविल्याचे आदेश रद्द करुन, त्यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरवुन उमेदवारी अर्ज स्वीकारावे असे आदेश औरंगाबाद खंडपीठातील सुट्टतील न्या. रविंद्र घुगे यांनी शनिवारी दिले.
रेखा पंडीत वाव्हुळे व ललिता रखमाजी गबाळे यांनी ग्रामपंचायत कळगांव (ता. पुर्णा जि. परभणी) वॉर्ड क्र. २ मधून अनुक्रमे ओबीसी व अनुसुचीत जाती प्रवर्गातून निवडणुकीकरीता ऑनलाईन अर्ज सादर केला होता. अर्जासोबत जातपडताळणी समितीकडे जात दावा प्रलंबीत असल्याबाबतचा पुरावा व जात प्रमाणपत्राची छायांकीत प्रत जोडली होती. छाननी दरम्यानही जात प्रमाणपत्राची छायांकीत प्रत सादर केली होती. परंतु निर्वाचन अधिकार्यांनी जात प्रमाणपत्राची छायांकीत प्रत न जोडल्याच्या कारणावरुन त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविला होता.या निर्णया विरोधात याचिकाकर्त्यांनी खंडपीठात याचिका केली .
याचीकेच्या सुनावणीअंती न्यायालयाने तांत्रिक मुद्यावर निर्वाचन अधिकार्याने उमेदवारी अर्ज अवैध ठरविणे चुकीचे असल्याबाबत नमूद करत याचीकाकर्त्यांच्या याचिका मान्य केल्या व त्यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवून स्विकृत करण्याचे आदेशीत केले.
याचीकाकर्त्यातर्फे शहाजी घाटोळ-पाटील यांनी काम पाहीले तर राज्य शासनाच्या वतीने बी.व्ही. विर्धे तर निर्वाचन आयोगातर्फे अजित कडेठाणकर यांनी काम पाहिले.
खंडपीठाच्या निर्णयामुळे तृतीयपंथीयास दिलासा
राज्यभर सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत तृतीयपंथीय व्यक्तीने उमेदवारी अर्ज दाखल केला. स्त्री राखीव प्रवर्गातून भरलेला अर्ज फेटाळल्यामुळे भादली (बु) या जळगाव जिल्हातील तृतीयपंथीयाने औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे यांनी त्यास संपूर्ण आयुष्यभरात कुठल्याही एकाच प्रवर्गाच्या सवलती घेण्याची परवानगी दिली. खंडपीठाच्या निर्णयामुळे तृतीयपंथीयास दिलासा मिळाला.
जळगाव तालुक्यातील भादली (बु) ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा झाली.ग्रामपंचायत सदस्य म्हणून स्त्री राखील वार्डातून निवडणूक लढविण्यासाठी अंजलीगुरू संजना जान या तृतीयपंथीयाने अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णयअधिकारी यांनी संबंधिताचा स्त्री प्रवर्गासाठी राखील असलेल्या वार्डातून
निवडणूक लढविण्याची मागणी फेटाळली. संबंधित खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढवू शकतो असेही सूचित केले. अंजली गुरू यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली.आयुष्यात एकच लिंग निवडून त्या लिंगाशी संबंधित सवलत घेण्यास खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाआधारे व २०१९ च्या कायद्यानुसार परवानगी दिली.याचिकाकर्त्याची बाजू आनंद भंडारी यांनी मांडली.