ग्रामीणमध्ये कोवीड चाचण्यात वाढ करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

Image

औरंगाबाद ६ऑगस्ट /प्रतिनिधी :- जिल्ह्यात कोवीड संसर्ग आटोक्यात येत असून रुग्ण बरे होण्याचा दर 97.42 % आहे. मात्र आता सर्व व्यवहार सुरु करण्यास परवानगी दिलेली असल्याने संसर्ग वाढणार नाही याची अधिक खबरदारी घेत शहराप्रमाणे ग्रामीणमध्ये कोवीड चाचण्या वाढवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिल्या.

Image

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोवीड उपाय योजनांच्या आढावा बैठकीत श्री.चव्हाण यांनी जिल्ह्यातील कोवीड उपचार सुविधा, मनुष्यबळ, यंत्रसामुग्रीची उपलब्धता या सर्व बाबींचा सविस्तर आढावा घेतला. तिसऱ्या संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर पर्याप्त उपचार सुविधांसह सज्ज राहण्याचे सूचीत करुन चव्हाण यांनी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांची कोवीड चाचणी करावी. तसेच ताप असणाऱ्या लहाण मुलांच्याही आरटीपीसीआर चाचण्या करण्याच्या सूचना संबंधिताना दिल्या.

तसेच जिल्ह्यात आता सर्व बाबी अटी, शर्तीच्या अधीन खुल्या करण्यात आल्या असून विहीत कालावधीत हॉटेल, रेस्टॅारंट, दुकाने इतर व्यवहार बंद होण्याबाबत संबंधित यंत्रणांनी लक्ष ठेवावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात कोवीड चाचण्यात वाढ करण्यासोबतच प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा तालुका रुग्णालयांमधील कर्मचारी, अधिकारी यांना तिसऱ्या संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षण देऊन आरोग्य यंत्रणा सज्जा ठेवावी. कोवीड लस न घेतलेल्या तसेच लसीचा एकच डोस घेतलेल्यांच्या नियमित महिन्याच्या अंतराने कोवीड चाचण्या करण्याचे चव्हाण यांनी यावेळी सूचीत केले.बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.