रेमडेसीवीरचा वापर करताना मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद ,२५ एप्रिल /प्रतिनिधी – जिल्ह्यातील वाढता संसर्ग आणि रेमडेसीवीरची वाढती मागणी पाहता डॉक्टरांनी रेमडीसिवीरचा वापर करताना मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे निर्देश संबंधित सर्व डॉक्टरांना आज येथे दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात रेमडेसीवीर आणि ऑक्सीजन बाबत शहरातील डॉक्टरांकरिता वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण बोलत होते.

या बेबीनारसाठी शहरातील सर्व डॉक्टरासह, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अंनत गव्हाणे, घाटीच्या अधिष्ठाता डॉ कानन येळीकर, घाटीच्या औषध विभाग प्रमुख डॉ. मिनाक्षी भट्टाचार्या, अन्न औषध प्रशासन सह आयुक्त संजय काळे उपस्थित होते.

या वेबिनारच्या सुरुवातीला डॉ. मिनाक्षी भट्टाचार्य यांनी रेमडिसीवर पेशंटला कधी द्यावे, कोणत्या परिस्थितीत किती प्रमाणात द्यावेॽ खरचं प्रत्येक पेशंटला रेमडिसीवीरची आवश्यकता असते काॽ याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच रेमडिसीवीर जादूची कांडी नाही, किंवा ते रामबाण औषध नाही म्हणूनच प्रत्येकाला रेमडिसीवीरची आवश्यकता नसते. गरज नसतांना आपण रेमडिसीवीर दिल्यास खरंच गरज असणाऱ्या रुग्णांना हे इंजेक्शन उपलब्ध होणार नाही. त्यामुळे मार्गदर्शक सूचनाचे काटेकोर पालन करावे अशा सूचना देखील यावेळी दिल्या. तर डॉ. कानन येळीकर यांनी ऑक्सीजनचा वापर करताना घ्यावयाची काळजी, आवश्यकता याबाबत माहिती देत संबंधित डॉक्टरांच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे यावेळी त्यांनी दिली.यावेळी वेबिनारच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक डॉक्टरानी आपल्या शंकाचे निरसन करून घेतले.