पैठण गेट ते क्रांतिचौक १०० फुट रस्ता बाधित डीपी रोड अतिक्रमण मुक्त
पैठण गेट येथील अतिक्रमीत १६ मोबाईल दुकाने काढले
छत्रपती संभाजीनगर,१३ एप्रिल / प्रतिनिधी :- महानगरपालिका अतिक्रमण हटाव विभाग मार्फत आज शहरातील मध्यवर्ती भागातील पैठण गेट ते क्रांती चौक हा १०० फूट डीपी रोड आज पूर्णपणे अतिक्रमण मुक्त करण्यात आला आहे.
सन २०१० पासून या ठिकाणी विशेष भूसंपादन अधिकारी यांनी जमीन संपादन करून महानगरपालिकेला तसा अहवाल सादर केला होता.या अहवालावर महानगरपालिकेने २०१० साली रस्ता रुंदीकरण ची मोहीम हाती घेतली होती .परंतु या ना त्या कारणामुळे व काही घरमालक भाडेकरू वादामुळे किंवा काही आपसातील नातेवाईक यांच्यामुळे या रस्त्यावर विकासाचे काम होऊ शकत नव्हते. परंतु २०१४ साली बराच भाग काढून रस्ता मोकळा करण्यात आला होता. दरम्यानच्या काळात काही नागरिकांनी न्यायालयात या बाबत धाव घेतली होती परंतु दावे प्रतीदावे विड्रॉल करून महानगरपालिकेकडे रीतसर परवानगीसाठी अर्ज देऊन बांधकाम करून घेतले आणि खुली जागा महापालिकेला दिली होती परंतु सिटी नंबर 14881 चे मालक यांनी त्याच्या रस्ताबाधित जागेवर सात बाय दहा व आठ बाय दहा ,दहा बाय दहा या आकाराचे एकूण सोळा मोबाईलचे दुकान भाड्याने दिले होते. या सर्व जवळपास १६ दुकानांमध्ये सर्व प्रकारचे मोबाईलचे साहित्य दुरुस्ती नवीन मोबाईल असे एक छोटे मार्केट निर्माण झाले होते या मार्केटमुळे संध्याकाळी या ठिकाणी मोठी गर्दी व्हायची आणि गर्दीमुळे वाहतुकीला अडथळा होऊन नागरिकांचे आपसात जोरदार भांडण व्हायचे दरम्यान वाहतूक पोलीस सुद्धा कारवाई करायचे. परंतु अतिरिक्त आयुक्त रवींद्र कदम यांनी यांच्याशी चर्चा केली व त्यांना टीडीआर किंवा इतर सुविधा कशा प्रकारे उपलब्ध करून देता येईल याबाबत त्यांचे मार्गदर्शन केले आणि आज हा शंभर फुटी रस्ता पूर्णपणे मोकळा करण्यात आला आहे.
या १६ दुकानदारांनी प्रथम विरोध केला परंतु नंतर त्यांनी प्रशासनास सहकार्य केले व आपले अतिक्रमण काढून घेतले. नंतर जेसीबीच्या साह्याने महानगरपालिकेने हे सर्व १६ दुकाने निष्काशीत केली व पैठण गेट पूर्णपणे अतिक्रमण मुक्त केले.आता पैठण गेट पासून नूतन कॉलनी आणि नूतन कॉलनी पासून क्रांती चौक हा रस्ता बाधित अतिक्रमण पासून शंभर फुटी रस्ता नागरिकांच्या सेवेसाठी अतिक्रमण मुक्त झाला आहे. दोन्ही बाजूचे अतिक्रमणे काढण्यात आली आहे यापुढे शनिवार आणि सोमवारी उर्वरित अतिक्रमणवर कारवाई करण्यात येणार आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने ज्या हातगाड्या उभ्या आहेत किंवा शेड पुढे टाकण्यात आले आहे अशा नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी स्वतःहून काढून घ्यावे नसता महानगरपालिकेचे वतीने अतिक्रमण काढण्यात येईल .
सदर कारवाई प्रशासक डॉअभिजीत चौधरी यांच्या आदेशानुसार अतिरिक आयुक्त तथा अतिक्रमण विभाग प्रमुख रवींद्र निकम यांचे मार्गदर्शनाखाली पद निर्देशित अधिकारी वसंत भोये, सविता सोनवणे ,पोलीस निरीक्षक हाश्मी, इमारत निरीक्षक सय्यद जमशेद ,आर एम सुरासे, रवींद्र देसाई यांनी कारवाईत सहभाग घेतल्याची महिती अतिक्रमण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.