दहशतवादी पकडण्याचे आभासी प्रात्यक्षिक; पोलिस महासंचालकांना नोटीस

औरंगाबाद,६फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  दहशतवादी पकडण्यासाठी पोलिसांकडून करण्यात आलेल्या  आभासी प्रात्यक्षिकादरम्यान (माॅकड्रिल) मुस्लिमद्वेष पसरवण्याचे चित्र निर्माण
केल्याप्रकरणी दाखल फौजदारी जनहित याचिकेच्या सुनावणीवेळी मुंबई उच्च न्य्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. मंगेश पाटील व न्या. संतोष
चपळगावकर यांनी गृहमंत्रालय, पोलिस महासंचालक व इतर प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. पुढील सुनावणीपर्यंत विशेष समुदायातील
संबंधित व्यक्तीला दहशतवादी म्हणून चित्रण दाखविण्यास कोणतेही माॅकड्रिल केले जाणार नाही, असे प्रतिबंधित आदेशही दिले आहेत.

याप्रकरणी मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्ते सय्यद आैसामा अब्दुल कदीर यांनी ॲड. सय्यद तौसीफ यासिन यांच्यामार्फत उपरोक्त याचिका दाखल केली
आहे. याचिकेनुसार काही दिवसांपूर्वी अहमदनगर व चंद्रपूर पोलिसांची दहशतवादी पकडण्याकरिता करण्यात आलेले माॅकड्रिल वादाच्या भोवऱ्यात सापडले
होते. विशेष करून अहमदनगर बसस्थानकात करण्यात आलेल्या माॅकड्रिलमध्ये अतिरेकी भूमिकेतील व्यक्ती “नारे तकबीर, अल्लाहू अकबर” च्या घोषणा देत
होता. या घटनेचा चित्रिकरण समाजमाध्यमामध्ये पसरले. संबंधित चित्रिकरण पाहिल्यानंतर अतिरेकी हा मुस्लिम समाजाचाच असतो हा गैरसमज लोकांच्या
मनावर बिंबवण्यासाठी जाणून-बुजून दाखविले गेले होते. याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार मुद्दाम मुस्लिमांना दहशतवादी म्हणून दाखवणे हे स्पष्टपणे
पोलिसांचे मुस्लिम द्वेष व समाजाविरुद्धचा पक्षपातीपणा दर्शवते आणि दहशतवाद्यांचा धर्म असल्याचा संदेश जातो. पोलिसांचे हे बेकायदेशीरकृत्य
एखाद्या व्यक्तीला सन्मानाने जगणाऱ्याचे घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन करते, तसेच देशाच्या अखंडतेला आणि एकात्मतेला धोका निर्माण करणारा असून
पोलिसांच्या अशा कृत्यामुळे मुस्लिम समाजाच्या विश्वासाला तडा जातो.
त्यामुळे यातील दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी १० फेब्रुवारी रोजी होणार आहे.
शासनाकडून ॲड. डी. आर. काळे यांनी काम पाहिले.