जालना जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना 103.26 कोटी रुपये विमा नुकसान भरपाई रक्कम मंजूर

जालना ,१८ जानेवारी / प्रतिनिधी :-प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2021 मध्ये जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत एकूण  1 लाख 73 हजार 906  शेतकऱ्यांना 103.26  कोटी रुपये विमा नुकसान भरपाई रक्कम मंजूर करण्यात आलेली होती.त्यापैकी एकूण 1 लाख 70 हजार 532  शेतकऱ्यांच्या खात्यात 103.02  कोटी रुपये नुकसान भरपाई रक्कम जमा करण्यात आलेली आहे.खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत जिल्ह्यातील एकूण 18 हजार 297  शेतकऱ्यांना 5.84 कोटी रुपये विमा नुकसान भरपाई अदा करण्यात आलेली असून स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत शिल्लक 3 हजार 374 शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई काम अदा करण्याचे काम  चालू असून ते लवकरच पूर्ण होईल अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी दिली.

            दिनांक 29 जून 2020 च्या शासन निर्णयानुसार जालना जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप व रब्बी हंगामासाठी सन 2020-2021 पासून तीन वर्षासाठी रिलायंस जनरल इन्शुरंस विमा कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे.त्यानुषंगाने सन 2021-2022 च्या खरीप हंगामामध्ये एकूण 5 लाख 5 हजार 508  शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभाग नोंदविला आहे.त्यामध्ये सोयाबीन पिकासाठी 1 लाख 44 हजार 54,कापूस पिकासाठी 34 हजार 805,बाजरी पिकासाठी 54 हजार 999,तूर पिकासाठी 67 हजार 642,मका पिकासाठी 28 हजार 595,मुग पिकासाठी 1 लाख 17 हजार 637,उडीद पिकासाठी 57 हजार 776  शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे.29 जून 2020 च्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 10.4 नुसार स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत एकूण 1 लाख 90 हजार 134 शेतकऱ्यांनी नुकसान पूर्वसूचना विमा कंपनीस सादर केल्या होत्या.त्यामध्ये एकूण 1 लाख 73 हजार 906  शेतकऱ्यांना विमा कंपनीने पात्र घोषित केले असून 16 हजार 228  शेतकऱ्यांना अपात्र घोषित केलेले आहे.तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत वैयक्तिक स्तरावर नुकसान भरपाई निश्चित करताना पिकाची वाढीची अवस्था व नुकसानीची टक्केवारी विचारात घेऊन  केलेली आहे.

            योजनेच्या मार्गदर्शक सुचणेनुसार हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत सोयाबीन पिकासाठी काढण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील एकूण 7 महसूल मंडळामध्ये 18 हजार 297  शेतकऱ्यांना 5.84 कोटी विमा नुकसान भरपाई अदा करण्यात आलेली आहे.तसेच काढणी पश्चात नुकसान अंतर्गत जिल्ह्यामध्ये एकूण 4 हजार 423  नुकसान पूर्वसूचना प्राप्त झालेल्या होत्या.त्यामध्ये विमा कंपनीने 807 शेतकऱ्यांना 38.46 लक्ष विमा नुकसान भरपाई मंजूर केलेली असून बाकी 3 हजार 616  शेतकऱ्यांचे सर्व्हेक्षण पूर्ण झालेले असून नुकसान भरपाई निश्चिती करण्याचे काम चालू असल्याचे विमा कंपनीने कळविले आहे.

            ज्या शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आतमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती वा काढणी पश्चात नुकसान अंतर्गत नुकसान पूर्वसूचना दिलेली नव्हती त्यांना  शासन निर्णयानुसार हंगामाच्या शेवटी पिक कापणी प्रयोगावर आधारित संबधित महसूल मंडळाच्या वा तालुक्याच्या येणाऱ्या सरासरी उत्पन्नाच्या आधारे विमा नुकसान भरपाई निश्चिती करण्यात येत आहे.  यामुळे शेतकऱ्यांनी  कोठेही तक्रार अर्ज दाखल करून नयेत असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी केले आहे अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जालना यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.        

पिण्याच्या पाण्याशिवाय पाणीउपसा करण्यास प्रतिबंध

 जिल्ह्यातील  30 गावातील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत अंतिमत: जाहीर करुन पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत संरक्षित होण्याच्या दृष्टीने स्त्रोतापासुन 500 मीटरच्या आत पिण्याच्या पाण्याच्या प्रयोजनाशिवाय अन्य कारणासाठी स्त्रोत निर्माण करण्यास अथवा या सार्वजनिक स्त्रोतामधुन पिण्याच्या पाण्याशिवाय पाणीउपसा करण्यास महाराष्ट्र भुजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम 2009 मधील कलम 20 नुसार प्राप्त अधिकारान्वये प्रतिबंध करण्यात आला असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सांगितलं. 

  अंबड तालुक्यातील आलमगाव, आपेगाव, भालेगाव,चांभारवाडी, चंदनापुरी खु. चिंचखेड, चुरमापुरी, धनगर पिंपळगाव, कर्जत, लोणार भायगाव व रामनगर अशी एकुण 11 गावे,  भोकरदन तालुक्यातील वालसा वडाळा, गोद्री, हसनाबाद, नळणी खु. नांजा व वाडी, बरंजळा साबळे, श्रीकृष्ण नगर, वडशेद अशी एकुण 8 गावे, जालना तालुक्यातील धारकल्याण, हिवरा रोषणगाव, कार्ला, सिंधी काळेगाव, वाघ्रुळ जहांगिर, सोमनाथ, हातवन, आंतरावाला (जालना), दरेगाव (जालना) अशी 9 गावे तर जाफ्राबाद तालुक्यातील चिंचखेडा व सातेफळ या गावांचा समावेश आहेत.