शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांचा राडा:विधीमंडळाच्या लॉबीत दादा भुसे आणि महेंद्र थोरवेंची एकमेकांना धक्काबुक्की!

मुंबई,१ मार्च / प्रतिनिधी :-विधीमंडळाच्या लॉबीत आज शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेचे मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. यानंतर शंभूराज देसाई आणि भरत गोगावले यांना मध्यस्थी करावी लागली. कोणत्या कारणावरून हा वाद झाला हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहामध्ये आले होते, त्यावेळी शिवसेना प्रवक्ते भरत गोगावले आणि इतर शिवसेनेचे आमदार त्यांच्यासोबत होते. त्यानंतर मुख्यमंत्री सभागृहामध्ये गेले, त्यावेळी लॉबीमध्ये महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली. त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असणारे भरत गोगावले आणि मंत्री शंभूराजे देसाई यांनी मध्यस्थी करत महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांना थांबवण्याचा प्रयत्न केला.

कोणताही राडा झाला नाही : शंभुराज देसाई

दरम्यान, शंभूराज देसाई यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे की, कोणताही राडा झालेला नाही. काय पुरावा आहे? मी माध्यमांना प्रश्न विचारतो, लॉबीमध्ये माध्यमांचा कुठला कॅमेरा नाही. तरी तुम्ही कसे चालवता, असं शंभूराज देसाईंनी म्हटलं आहे. एक मंत्री आणि आमदार चर्चा करत होते. चर्चा करताना फक्त आवाज वाढला. संबंधित आमदारांना आम्ही लॉबीमध्ये घेऊन चर्चा केली. वाद झाला नाही, कुणी भिडले नाही. बोलता बोलता मोठ्या आवाजात बोलले म्हणजे वाद झाला का, असा सवाल शंभुराज देसाईंनी विचारला आहे.

भुसे-थोरवे यांच्यातील वाद नेमका कशावरुन? थोरवेंनी स्पष्टच सांगितलं…

महेंद्र थोरवे म्हणाले की, बाळासाहेबांनी शिकवलं आहे, तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर तोंडात मारून न्याय मिळवा. दादा भुसे एकदम नकारात्मक मंत्री आहे. माझ्या मतदारसंघातलं काम होत नाही हे विचारलं तर माझ्यावर आवाज चढवला. या कामासाठी मुख्यमंत्र्यांनी आणि श्रीकांत शिंदेंनी देखील फोन केला होता. आमदारांची कामं होत नसतील तर काय करणार? आम्ही शिवसैनिक आहोत, स्वाभिमानी आहोत आम्ही सरपंच नाही तर लाखो लोकांचे प्रतिनिधित्व करतो, असे ते म्हणाले.

मंत्री असणारे दादा भुसे यांच्याकडे मी कामानिमित्त गेलो होतो. दोन महिन्यांपासून आमदार भरत गोगावले असतील किंवा मी स्वतः असेन, आम्ही कामाचा पाठपुरावा करत आहोत. माझ्या मतदारसंघातील कामाबाबत मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दादा भुसे यांना कॉल करून सांगितलं होतं. खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी सुद्धा त्यांना कॉल करून सांगितले की काम करून घ्या. परंतु दादा भुसेंनी सांगून सुद्धा त्यांनी जाणीवपूर्वक काम केलं नाही. आज मी त्यांना त्याबाबत विचारलं की, दादा बाकीच्या लोकांची कामं झाली, त्यासाठी काल तुम्ही मीटिंग घेतली, पण मी सांगितलेलं कामं, मुख्यमंत्र्यांनी सांगून सुद्धा तुम्ही मीटिंगमध्ये घेतलं नाही.

मी काही तुमच्या घरी खायला येत नाही

मी त्यांना विचारायला गेलो, तर दादा भुसे माझ्यावर चिडून बोलले. मी विचार केला आम्ही स्वाभिमानी आमदार आहोत, आम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर प्रामाणिकपणे आहोत, तुमच्यावर मुख्यमंत्र्यांनी जबाबदार दिली आहे मंत्री म्हणून, त्यांनी आमदारांची कामे प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केली पाहिजेत. अशा पद्धतीने आम्हाला उत्तर देऊन आम्ही आमचा स्वाभिमान विकणार नाही. त्यामुळे मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की मी काही तुमच्या घरी खायला येत नाही. मी सांगितलेलं काम जे आहे ते जनतेचं काम आहे. त्या ठिकाणी काम झालंच पाहिजे. माझ्या मतदारसंघातलं काम आहे आणि ते काम तुम्ही त्या ठिकाणी करून द्या, असं त्यांना सांगितलं. परंतु त्यांची बॉडी लँग्वेज आणि पाहण्याचा दृष्टीकोन वेगळ्या पद्धतीचा होता. म्हणून आमच्यात थोडी शाब्दिक चकमक झाली, असं थोरवे म्हणाले.