पहाटेच्या शपथविधीबद्दल देवेंद्र फडणवीसांनी केला गौप्यस्फोट; म्हणाले ‘शरद पवारांशी चर्चा झाली त्यानंतर गोष्टी ठरल्या’

मुंबई,१३ फेब्रुवारी/ प्रतिनिधी :-पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेचा शपथविधी चर्चेत आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात त्या शपथविधीबद्दल अनेक गौप्यस्फोट केले. ते म्हणाले की, “आमच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच ऑफर आली, की आम्हाला स्थिर सरकार हवे आहे. म्हणून आपण सरकार तयार करूया. राजकारणात जेव्हा एखादा व्यक्ती तुम्हाला दगा देतो, तेव्हा तुम्हाला चेहरा पाहत बसता येत नाही. मग आम्हीही निर्णय केला आणि त्यांच्याशी चर्चा केली.” असे म्हंटल्यानंतर ते म्हणाले की, “जी चर्चा झाली होती ती शरद पवार साहेबांशीच झाली होती.” असा गौप्यस्फोट त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, “शरद पवारांशी चर्चा झाली त्यानंतर गोष्टी ठरल्या. त्या गोष्टी ठरल्यानंतर कशा बदलल्या हे आपण सर्वांनी पाहिले आहे. त्यावेळी आमच्यासोबत विश्वासघातच झाला. पहिला विश्वासघात हा मी जास्त मोठा मानतो, कारण तो आपल्या जवळच्या व्यक्तीने केला होता. हा छोटा होता. अजितदादांनी आमच्यासोबत घेतलेली शपथ फसवणुकीची नाही तर प्रामाणिक भावनेतून घेतली होती. पण नंतर ते कसे तोंडघाशी पडले हे अजितदादाच सांगू शकतील.” असे म्हणत त्यांनी अनेक गोष्टींबद्दल आपले मत स्पष्ट केले.