विद्यार्थी केंद्रबिंदू मानून भविष्यकालीन शैक्षणिक वाटचाल – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

मुंबई, दि. ३ : महाराष्ट्र शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत प्रगत राज्य  असून  विद्यार्थी केंद्रबिंदू मानून, भविष्यकालीन शैक्षणिक वाटचाल असावी असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ च्या अनुषंगाने राज्याच्या दृष्टीने आवश्यक बदल करण्यासाठी नियुक्त केलेल्या कार्यबल गटाची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली.

बैठकीला अपर मुख्य सचिव राजीव जलोटा, संचालक धनराज माने, तंत्रशिक्षण संचालक अभय वाघ, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या कार्यबल समितीचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ च्या कार्यबल समितीचे अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात, दोन्ही  समितीचे सदस्य व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, राज्याने नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करत असताना आधीच्या आणि नवीन धोरणातील अडचणी दूर करून भविष्याचे धोरण ठरविणे आवश्यक आहे.  धोरण ठरवित असताना उच्च व तंत्र विभागाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य समितीला केले जाईल.

केंद्र सरकारने सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपी) ६ टक्के खर्च हा शैक्षणिक क्षेत्रावर करणार असल्याचे धोरणात सांगितले आहे. ही निश्चितपणे आनंदाची बाब आहे. या माध्यमातून राज्याला अधिक निधी मिळू शकतो. राज्यानेही त्या अनुषंगाने प्रयत्नशील असणे गरजेचे आहे, असेही श्री. सामंत यावेळी म्हणाले.

या दोन्ही समित्या आपला अहवाल तीन महिन्यात शासनाला सादर करणार आहेत. या अहवालातून राज्यासाठी जे धोरण निश्चित होणार आहे ते देशाला दिशादर्शक  असेल असेही श्री. सामंत यांनी सांगितले.

उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, म्हणाले, राज्याचे शैक्षणिक धोरण ठरवित असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा कशा मिळू शकतील, याचाही विचार होणे आवश्यक आहे. विद्यार्थी हित हे दोन्ही समित्यांसाठी प्राधान्यावर असावे.

सुखदेव थोरात म्हणाले, शिक्षण हा विषय समवर्ती सूचित येत असल्याने त्या अनुषंगाने समिती विचार करेल. समितीला या धोरणावर काम करताना सर्व बाबींचा विचार करावा लागेल. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणींचाही विचार करणे क्रमप्राप्त आहे.

डॉ.रघुनाथ माशेलकर म्हणाले, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० कार्यबल समिती ही देशाचे भविष्य घडवणारी समिती आहे. डिजिटल ऍक्सेस सर्व भागातील विद्यार्थ्यांना मिळणे गरजेचे असून त्या दृष्टीने समिती विचार करेल.