महायुतीच्या अनेक दिग्गजांना धक्का देत नव्यांना संधी देणार

भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीच्या महायुतीचे जागा वाटप आणि उमेदवारांची नावे जवळपास अंतिम

मुंबई,२९ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपने ‘अबकी बार ४०० पार’चा नारा दिला आहे. तर इकडे महाराष्ट्रातही महायुतीने ४५+ जागा जिंकण्याचा विडा उचलला आहे. यासाठी शिंदे-फडणवीस-पवारांनी रणनीती आखली आहे. अनेक जागांवर बदल करण्याची तयारीही झाली आहे. शिंदे-फडणवीस-पवारांच्या या रणनितीपुढे विरोधकांची गाळण उडणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीच्या महायुतीने जागा वाटप आणि उमेदवारांची नावे जवळपास अंतिम केली आहेत. यात काही मतदारसंघांमध्ये अत्यंत धक्कादायक नावे समोर येत आहेत. याठिकाणी प्रस्थापितांना धक्का देत भाजप नवख्यांना उमेदवारी देण्याच्या तयारी आहे.

भाजपने उत्तर मध्य मुंबईचे विद्यमान खासदार मनोज कोटक यांचा पत्ता कट केला आहे. त्यांच्याऐवजी घाटकोपर पूर्वचे आमदार पराग शहा हे उमेदवार असतील. तर दक्षिण मुंबई मतदार संघातून खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना उमेदवारी निश्चित केली आहे. दक्षिण मध्य मुंबईमधून राहुल शेवाळे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.

उत्तर पश्चिम मतदारसंघात खासदार गजानन कीर्तीकर यांचा पत्ता कट होणार आहे. वयोमान आणि तब्येतीमुळे त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यासाठी शिंदेंनी नकार दिला आहे. कीर्तीकर यांच्या जागी शिंदे यांच्या डोक्यात ठाकरे गटातील आमदार रवींद्र वायकर यांचे नाव आहे. वायकरांचा येत्या काही दिवसांतच शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचे सांगितले जात आहे. एकेकाळी गजानन कीर्तिकर यांचे स्वीय सहायक म्हणून काम करणाऱ्या वायकर यांना या मतदारसंघाचा कोपरा अन् कोपरा तोंडपाठ आहे.

धुळे लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुभाष भामरे यांच्याही उमेदवारी काट मारण्यात आली आहे. या जागी आमदार अमरीश पटेल यांचे समर्थक माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांना उमेदवारी देण्यावर एकमत झाले आहे. जळगाव लोकसभा मतदार संघात खासदार उन्मेष पाटील यांच्याविषयी आमदारांनी नाराजी व्यक्त केल्याने त्यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे याठिकाणी गिरीश महाजन यांचे समर्थक असलेले चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या नावाची चाचपणी केली जात आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांचाही पत्ता कट होणार आहे. या ठिकाणी नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले माजी खासदार उल्हास पाटील यांची कन्या केतकी पाटील यांना संधी दिली जाईल, असे सांगण्यात आले आहे. केतकी पाटील यांनीही रावेर लोकसभा मतदारसंघात काही दिवसांपासून तयारी सुरु केली आहे. नुकतेच त्यांनी गाव तिथे संपर्क अभियान राबविले होते. मात्र शेवटच्या क्षणी एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश झाल्यास या जागेवर बदलाचे संकेत आहेत.

अकोला मतदारसंघाचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांना पुन्हा उमेदवारी मिळणार नाही. आरोग्याच्या समस्येमुळे त्यांना उमेदवारी दिली जाणार नाही. या जागेवर खामगावचे आमदार आकाश फुंडकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. आकाश फुंडकर यांचे वडील पांडुरंग फुंडकर हे दोनवेळा अकोल्याचे खासदार म्हणून निवडून आले आहेत. कुणबी मतांचा प्रभाव असल्याने आकाश फुंडकर हे दावेदार आहेत. त्यांच्या जागी माजी आमदार दिलीप सानंदा हे भाजपच्या वाटेवर असल्याने त्यांना खामगावमध्ये विधानभेसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार हिना गावित यांना पुन्हा संधी मिळेल का यावर सध्या मोठे प्रश्नचिन्ह आहे. गावित कुटुंबियांच्या एककल्ली कारभारावर सर्वपक्षीय आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. आमदाराच्या या नाराजीवर तोडगा निघाला नाही तर काँग्रेसचे माजी मंत्री पद्माकर वळवी यांची मुलगी सीमा वळवी या प्रमुख दावेदार मानल्या जात आहे. सीमा या काँग्रेसचे माजी मंत्री स्वरुपसिंग नाईक यांची सून आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षही आहेत. त्यांना जिल्यातील सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे.

बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या प्रताप जाधव यांना चौथ्यांदा संधी मिळणार आहे. कल्याण लोसभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार आहे. नगर दक्षिणमध्ये विद्यमान खासदार सुजय विखे हेच भाजपचे उमेदवार असतील. रायगडमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार सुनील तटकरे यांनाच पुन्हा संधी दिली जाणार आहे.