“मी सागर बंगल्यावर येतो, मला मारुन दाखवा”; मनोज जरांगेंचा फडणवीसांवर घणाघात

फडणवीस मला ब्राह्मणी कावा दाखवत आहेत.

जरांगे उठून निघाले आणि सागर बंगल्याकडे जाताना रस्त्यात भोवळ येऊन पडले…

मनोज जरांगे आक्रमक

मुंबई,२५ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मराठा समाजाला संबोधित करताना त्यांनी सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या. यावेळी ते फडणवीसांवर टीका करताना म्हणाले, मी सागर बंगल्यावर येतो. फडणवीसांनी मला मारून दाखवावं. मला मारण्याचा हे प्रयत्न करत आहेत. सलाईनमधून मला विष देण्याचा प्रयत्न झाला. या सर्व घडामोडींमागे फडणवीस आहेत, असा गंभीर आरोप जरांगे यांनी फडणवीसांवर केला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आणि सगेसोयऱ्यांच्या अध्याधेशाच्या अंमलबजावणीच्या मागणीवर ठाम असणाऱ्या जरांगे यांनी आजच्या बैठकीच्या माध्यमातून विरोधकांवर सडकून टीका केलीय.

माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, सगळ्यांना जय श्री राम. आज आपली शेवटची आणि निर्णायक बैठक होत आहे. काय षडयंत्र आहेत आणि काय घडलंय ते समाजाला सांगायचं आहे. मी सलाईनवर जीवंत आहे. मी आतून पूर्ण संपलेलो आहे. मी एका सामन्य घरातील शेतकऱ्याचं पोरंग म्हणून काम करतोय. समाजावर माझी खूप निष्ठा आहे आणि प्रेम आहे. म्हणून घे सर्व घडत आहे. कोणत्याही पक्षाने मला मदत केली नाही. मी फक्त समाजाचं काम करतो. मी कोणत्या पक्षाचा काम करत नाही. मराठ्यांना संपवण्याचा कट रचला जात आहे. यामागे देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे. मराठ्यांना मराठ्यांच्या हातातूनच हरवण्याचा काही लोकांचा डाव आहे, असे आरोप जरांगे यांनी केले आहेत.

“सलाईनमधून मला विष देण्याचा प्रयत्न केला. त्याला सत्ता आणायची असली तर मला मारावं लागणार आहे, असं त्याला वाटतंय. षडयंत्र रचतो, कोणलाही जमा करतो आणि माझ्यावर आरोप करतो. त्याला वाटतं मी दहा टक्के घ्यावं. त्याला वाटलं मी मराठ्यांचे खूप नेते दबाव टाकून फोडले. मी माझ्या समाजाला मायबाप मानलेलं आहे. म्हणून तो माझ्याविरोधात षडयंत्र रचतोय. मी मेलो तर मला सागर बंगल्यावर नेऊन टाका”, असा एकेरी उल्लेख करत जरांगेंनी फडणवीसांवर टीका केली

फडणवीसांवर हल्लाबोल करत ते म्हणाले, फडणवीस मला ब्राह्मणी कावा दाखवत आहेत. पण हे फडणवीस काय चीज आहेत हे मला माहिती आहे. एकनाथ शिंदे कधीच शिवसेना सोडू शकत नाहीत. छगन भुजबळ, अजित पवार हे कधीच राष्ट्रवादी सोडू शकत नाहीत. भाजपमध्ये अनेक नेते प्रवेश का करत आहेत. अशोक चव्हाण कधीही काँग्रेस सोडू शकत नाहीत. पण देवेंद्र फडणीसांच्या काव्यामुळे त्यांना पक्षाला सोडचिठ्ठी द्यावी लागली.

तसंच जरांगे म्हणाले, नारायण राणेंच्या माध्यमातून मला काहीही बोलायला सांगत आहेत. ५ महिने झाले तरी आंदोलकांवरील गुन्हे फडणवीस मागे घेत नाहीत. मी समाजासाठी काम करत असेल, तर काय चूक केलीय. मला मारायचा असेल तर लगेच मारून टाका. मी सागर बंगल्यावर येतो. मला काही झालं तर माझा मृतदेह त्यांच्या दारात नेऊन टाका. त्यांना माझा बळी घ्यायचा आहे, अस म्हणत जरांगेंनी विरोधकांवर तोफ डागली आहे.