शिवसैनिक पोकळ धमक्या देत नाही ; थेट कृती करतो, संजय राऊत यांचा इशारा
मला मुंबईत येण्यापासून रोखूनच दाखवा ,कंगना राणावतचे उघड आव्हान
मुंबई : मुंबईशी संबंध नसलेल्या कोणत्याही एैऱ्यागैऱ्यांनी वक्तव्य करू नये, असे सांगतानाच आम्ही शिवसैनिक आहोत. केवळ पोकळ धमक्या देत नाहीत, तर थेट कृती करतो, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगना राणौत हिला दिला आहे. अभिनेत्री कंगना राणौतच्या आरोपानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पाकव्याप्त काश्मीरमध्ये या बाईला एकदा शुटिंगला पाठवायला हवं असे देखील राऊत म्हणाले. हा मुंबई, महाराष्ट्राचा अपमान आहे. पोलिसांनी शहीद होवून मुंबई वाचवलीय, रक्षण केले. अशा मुंबई पोलिसांवर कुणीतरी एैरगैरे लोक ज्यांचा मुंबईशी संबंध नाही असे लोक बोलतायत असेही राऊत यावेळी म्हणाले. मुंबईबाबत काहीही बरळणाऱ्या अशा मेंटल केसेस आरोग्य खात्याने हाताळाव्यात. मुंबई पोलिसांनी त्याबाबत कठोर पावलं उचलावीत. अशा पागल लोकांना जे पक्ष पाठिंबा देत आहेत.
त्या पक्षांना पाकव्याप्त काश्मीरने मदतान केलं आहे का? तुम्हाला पाकिस्तानी लोकांनी मतदान केलं आहे का? मुंबई पोलीस हे पाकिस्तानचे पोलीस आहेत का? ज्या मुंबई पोलिसांनी अतिरेकी हल्ले परतवून लावून मुंबईचे संरक्षण केलं ते लोक काहीही बरळणार आहेत का? असा सवाल राऊत यांनी केला. असे म्हणत असतानाच, माझं नाव घेऊन कुणाला पब्लिसिटी स्टंट करायचा असेल तर खुशाल करा. पण मुंबई तुम्हाला पोसते. सर्व काही देते. ज्या मुंबईने हुतात्मे दिले. त्या मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल कोणीही उठून काहीही बोलू शकत नाही. आम्ही ते खपवून घेणार नाही. आम्ही शिवसैनिक आहोत. पोकळ धमक्या देत नाही. थेट कृती करतो, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
कंगना राणावतचे उघड आव्हान
मुंबई,
अभिनेत्री कंगना राणावत आणि तिने मुंबईबद्दल केलेले वक्तव्य याची सर्वत्र जोरदार चर्चा असतानाच आता तिने आणखी एक सनसनाटी विधान ट्विटरवर केले आहे.
‘मी मुंबईत न येण्याची धमकी अनेकांनी मला दिली आहे. पण, आता मी मुंबईत येणारच आहे. येत्या 9 सप्टेंबरला मी मुंबईत येणार हे नक्की आहे. वेळही मी कळवेन. कुणाच्या बापात हिंमत असेल तर मला त्यांनी रोखूनच दाखवावे,’ असे उघडउघड आव्हान तिने ट्विटच्या माध्यमातून दिले आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणापासून कंगना मुंबई पोलिसांवर सातत्याने टीका करीत आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा तपास योग्य दिशेने होत नसल्यावरून तिने मुंबई पोलिसांवर सडकून टीका केली. त्याची आत्महत्या नसून हत्याच आहे, असे सांगतानाच पोलिसांवर तिने अनेक गंभीर आरोप केले. मुंबई पोलिसांची आपल्याला सातत्याने भीती वाटत असल्याचे तिने सांगितले. यावरूनच खासदार संजय राऊत यांनी ‘ज्या लोकांना मुंबईची इतकी भीती वाटते त्यांनी येथे येऊ नये’ असे विधान केले. राऊत यांच्या वक्तव्यानंतर कंगनाने मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिली. त्यामुळे शिवसेना अधिकच संतापली.
मुंबईत राहण्याचा अधिकार नाही : गृहमंत्री देशमुख
कंगना राणावतने मुंबई पोलिसांची तुलना माफियांसोबत केल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही कठोर भूमिका घेतली आहे. ते म्हणाले की, कंगनाने मुंबई पोलिसांची तुलना माफियांसोबत केली आहे. त्यामुळे तिला महाराष्ट्रात किंवा मुंबईत राहण्याचा अधिकार नाही. मुंबई आणि महाराष्ट्र पोलिस हे सक्षम पोलिस दल आहे. त्याची तुलना स्कॉटलंड यार्ड पोलिसांसोबत केली जाते. अशा पोलिसांविषयी एखादी अभिनेत्री असे बोलत असेल तर ते योग्य नाही. त्यांना जर सुरक्षित वाटत नसेल तर त्यांना मुंबईत किंवा महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही.