भीषण अपघात! बापलेकासह पाच जणांचा जागीच मृत्यू

बीड,१२ जानेवारी / प्रतिनिधी :-गेल्या काही दिवसांत राज्यात अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.बीडमधून अशीच एक धक्कादायक अपघाताची बातमी समोर आली असून या भीषण अपघातात बापलेकासह पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

बीड-नगर मार्गावरील लिंबागणेश गावापासून काही अंतरावरील ससेवाडी शिवारात काल शुक्रवारी रात्री ८.३० च्या सुमारास ही घटना घडली. ट्रक व चारचाकी वाहनामध्ये झालेल्या जोरदार धडकीमुळे वडील-मुलासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात प्रल्हाद सिताराम घरत (वय ६३), नितिन प्रल्हाद घरत (४१, दोघेही रा. महाजनवाडी ता. जि. बीड) या पिता-पुत्रासह विनोद लक्ष्मण सानप (४० रा. वाघिरा ता. पाटोदा) अशा तिघांसह अन्य दोघांचा जागीच मृत्यू झाला. मृत अन्य दोघांची रात्री ११ पर्यंत ओळख पटली नव्हती. शवविच्छेदनासाठी मृतदेह बीडच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ओळख न पटलेले ट्रकमधील असल्याचे समजते. अपघात एवढा भीषण होता की सर्व मृतांना बाहेर काढण्यासाठी एकमेकांमध्ये अडकलेल्या वाहनांचा पत्रा कापण्यासाठी यंत्र मागवावे लागले होते. घटनास्थळावर एक क्रेनही आणण्यात आला होता. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त दोन्ही वाहने बाजूला करून नेकनूर पोलीस व स्थानिक नागरिकांचे वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदतकार्य सुरू होते.