भारतीय नौदलाची धाडसी कारवाई: अपहरण झालेल्या जहाजातून १५ भारतीयांची सुटका

नवी दिल्ली: भारतीय नौदलाने(indian navy) शुक्रवारी धाडसी कारवाई करताना सोमालियाजवळ अपहरण करण्यात आलेल्या एमव्ही लीला नारफॉक या जहाजावरील १५ भारतीयांना सुखरूप सोडवले. समुद्री चाच्यांकडून या जहाजाचे अपहरण करण्यात आले होते मात्र भारताच्या नौदलाने धडाकेबाज कारवाई करताना या जहाजावरील १५ भारतीयांची सुखरूप सुटका केली तसेच इतर सहा क्रू कर्मचाऱ्यांचीही सुटका करण्यात आली.

नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर अरबी समुद्रात एमव्ही लीला नॉरफोक या जहाजाचे अपहरण झाल्याची माहिती भारतीय नौदलाला मिळाली. त्यानंतर तातडीने ही कारवाई करण्यात आली. भारतीय नौदलाचे प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार यांनी या अपहरण कर्त्यांविरोधात कारवाईचे आदेश भारताच्या युद्धनौकांना दिले. त्यानंतर येथील जहाजावरील १५ भारतीयांसह २१ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. नौदलाच्या मार्कोस कमांडर्सकडून ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान, जहाजावर शोधमोहीम घेतली असताना नौदलाला येथे समुद्री चाचे आढळले नाहीत. या चाच्यांनी जहाजावर गोळीबार केला आणि त्यानंतर ते आश्रय घेऊन लपून बसले होते अशी माहिती सुटका झालेल्या सदस्यांनी दिली.

भारतीय नौदलाच्या यंत्रणेचा तातडीचा प्रतिसाद

अरबी समुद्रात लायबेरियाच्या एका  मालवाहू जहाजाच्या अपहरणाचा प्रयत्न होत असताना, सागरात तैनात असलेल्या भारतीय नौदलाच्या यंत्रणेने तातडीने प्रतिसाद देत कारवाई सुरू केली आहे. संकटात असलेल्या  या जहाजाने यूकेएमटीओ या पोर्टलवर एक संदेश पाठवला होता, ज्यामध्ये 4 जानेवारी 2024 च्या संध्याकाळी पाच ते सहा अज्ञात सशस्त्र कर्मचारी जहाजावर दाखल झाल्याचे सूचित करण्यात आले होते. हा संदेश प्राप्त होताच भारतीय नौदलाने तातडीने त्याची दखल घेतली आणि त्याची पडताळणी करण्यासाठी सागरी टेहळणी विमान पाठवले. तसेच या जहाजाच्या मदतीसाठी आयएनएस चेन्नई या युद्धनौकेला त्या दिशेने रवाना केले.

5 जानेवारी  2024 च्या सकाळी टेहळणी विमानाने या मालवाहू जहाजाच्या वर उड्डाण करून, जहाजासोबत संपर्क प्रस्थापित करून त्यावरील कर्मचारी सुरक्षित असल्याची खातरजमा केली. नौदलाच्या विमानाने या जहाजावर देखरेख सुरूच ठेवली आहे आणि आयएनएस चेन्नई या जहाजाच्या जवळ मदतीसाठी जात आहे.

या सर्व परिस्थितीवर या भागातील इतर संस्था/एमएनएफच्या समन्वयाने अतिशय बारीक लक्ष ठेवले  जात आहे. या भागातील व्यापारी जहाजांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय भागीदार आणि परदेशी मित्र देशांसोबत भारतीय नौदल वचनबद्ध आहे.